नवी दिल्ली – आपोआप कॉल लागू शकतो, या भीतीपायी सुरुवातीला स्मार्टफोनपासून दूर राहणारे ग्राहक आता उरलेले नसून, स्मार्टफोन्स, विविध ऍप्स आणि ऑनलाईन शॉपिंगसह बॅंकींग व्यवहार यामुळे भारतात इंटरनेटच्या वापरात गेल्या पाच वर्षांत राक्षसी वाढ झाली असून वर्ष 2020 मध्ये डेटा ट्रॅफिक 36% वाढली तर गेल्या पाच वर्षांत ही ट्रॅफिक 60 पटीने वाढली आहे. किमान 10 कोटी नवे 4-जी ग्राहक जोडले गेले असून इंटरनेट वारकर्त्यांची एकूण संख्या 70 कोटी पार पोहोचली आहे.
डेटा वापर वाढण्याच्या प्रकरणात भारत जगातील अग्रणी देशांमध्ये समाविष्ट झाला आहे. नोकियाने प्रसिद्ध केलेल्या मोबाइल ब्रॉडबॅंड इंडिया ट्रॅफिक (एमबिट) इंडेक्स, मधून ही माहिती समोर आली आहे. कोविड-19 महामारीदरम्यान बहुतांश वेळ घरात राहण्याच्या नाइलाजाचा चकित करणारा परिणाम दिसला. एमबिट इंडेक्सनुसार फोरजी डेटा वापरामुळे वर्ष 2020 मध्ये डेटा ट्रॅफिक दरवर्षी 36% वाढला. यादरम्यान 10 कोटी नव्या फोरजी ग्राहकांसह फोरजी ग्राहकसंख्या 70 कोटींवर गेली आहे. देशभरात एकूण डेटा ट्रॅफिकमध्ये एकट्या 4-जीचे योगदान98.7 टक्के राहिले. फोरजी हॅंडसेट बाळगणाऱ्यांची संख्या 60.7 कोटी पार झाली आहे.
देशात दरमहा डेटा वापर वाढण्याचे एक कारण ग्रामीण भागांत वेगाने वाढणारे नवे यूजर्स आहेत. मोबाइल हॅंडसेट करमणूक व उत्पादकतेच्या रूपात पुढे आले आहे. गेल्या काही वर्षांदरम्यान परवडणाऱ्या फोरजी हॅंडसेटच्या पुरवठ्यात वाढ व सरकार डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देणे हे यामागचे कारण आहे.
देशात आत्तापासून जवळपास 20 लाख सक्रिय5-जी हॅंडसेटस आहेत. त्यामुळे वर्ष 2025 पर्यंत शॉर्ट कंटेंटची मागणी दरमहा चौपट वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या पाच वर्षांत व्हॉइस ओव्हर एलटीई (व्हीओएलटीई) स्मार्टफोनची संख्या 56.3 कोटी झाली असून एकूण एलटीई हॅंडसेटमध्ये 93% युजर अद्यापही टूजी/थ्रीजी सेवांवर अवलंबून आहेत.
या सगळ्याचा अर्थ एकच आहे की, भारतात स्मार्टफोन्सची मागणी जगात सर्वाधिक असून प्रत्येक इंटरनेट युजर त्याच्या स्मार्टफोनवर दररोज सरासरी साडेपाच तास व्यस्त असतो. ऑनलाईन शिक्षण आणि शॉपिंगसह न्यूज चॅनल्समुळे हा स्क्रीन टाईम वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.