नवी दिल्ली – जुलै महिन्यात घाऊक महागाईचा दर 11.16 टक्के इतका मोजला गेला आहे. मात्र त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून या महागाईच्या दरात खात्रीने घट होत असल्याचे वातावरण कायम आहे.
अन्नधान्याच्या किमती कमी होत असल्यामुळे घाऊक महागाईची आकडेवारी कमी होत असली तरी मनुफॅक्चरिंग वस्तू आणि इंधन मात्र महाग होत आहे. त्यामुळे या आघाडीवर रिझर्व्ह बॅंकेला लक्ष द्यावे लागणार आहे.
मे महिन्यामध्ये घाऊक महागाइचा दर 13.11 टक्क्यावर गेल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणले होते. मात्र भारतात पाऊस चांगला पडला आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर फारसा परिणाम झालेला नाही. दुसऱ्या लॉक डाऊनमुळे वाहतुकीत अडथळे आले होते. त्याचबरोबर पुरवठा पातळीवर परिणाम झाला होता. त्यामुळे महागाई वाढत आहे असे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे.
आता परिस्थिती सुधारत असल्यामुळे ही महागाई कमी होईल आणि व्याजदरात वाढ करण्याची गरज पडणार नाही असे काही विश्लेषकांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्यापर्यंत तरी महागाईचा दर दहा टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र हा दर कमी होऊ शकेल असे काही विश्लेषकांना वाटते.