बीजिंग- करोनाचा उगम चीनमध्येच झाला हे त्यांनी नाकारले तरी सत्य आहे. चीनने वेळीच आरोग्य संघटना आणि अन्य देशांना करोनाची माहिती द्यायला हवी होती. मात्र त्यांनी तसेही केले नाही. करोनाचा वेगाने प्रसार होतो हे जाणून त्यांनी वुहानचा उर्वरीत चीनशी संपर्क तोडला. मात्र अन्य देशांकडे जाणाऱ्या विमानसेवा थांबवल्या नाहीत.
थोडक्यात करोनाचा सर्वदूर प्रसार करण्याचे पातक त्यांनी केले. मात्र या वाईट गोष्टींतही चीनकडून चांगले एक शिकण्यासारखे आहे. ते म्हणजे करोनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात चीननेच आघाडी घेतली आहे.
चीनने अशी कोणती रणनीती राबवली ज्यामुळे हे साध्य होउ शकले असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर मात्र तेवढेच सोपे आहे. ते म्हणजे आक्रमक पध्दतीने केल्या गेलेल्या चाचण्या.
चीनच्या किंगडाओ शहरांत आताही नव्याने काही बाधित सापडले आहेत. हे सगळे बाधित बाहेरच्या देशातून आलेले असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. कारण काहीही असले तरी आता प्रसार थोपवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याकरता केवळ पाचच दिवसांत संपूर्ण शहराची चाचणी केली जाणार आहे.
किंगडाओ शहराची लोकसंख्या आहे 90 लाख. अर्थात पाच दिवसांत म्हणजे काही तासांतच या 90 लाख लोकांची तपासणी केली जाणार आहे. तेथल्या यंत्रणेचा कॉन्फिडन्सही कमालीचा आहे. पाच नव्हे, तर केवळ तीन दिवसांतच ही मोहिम पूर्ण केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे केवळ 12 नवे बाधित आढळल्यानंतर सगळ्या शहराचीच चाचणी घेण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
या शहरातील आरोग्य क्षेत्राशी संबंधित कर्मचारी अर्थात डॉक्टर, डॉक्टरेतर कर्मचारी आणि विविध आजारांवर उपचार घेत असलेले रूग्ण अशा 1.4 लक्ष लोकांची चाचणी अगोदरच घेण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इतक्या वेगाने आणि इतक्या मोठ्या संख्येने चाचण्या घेतल्या जात असल्यामुळे चीनमधील जनजीवन बऱ्यापैकी पूर्वपदावर आले आहे. सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. लोक मोठ्या संख्येने त्यात सहभागी होत आहे. तसेच सरकारही अशा कार्यक्रमांना आणि त्यात सहभागी होण्याला प्रोत्साहन देत आहे.