आमदार गोरे, दिलीप मोहिते की अतुल देशमुख यापैकी कोणाला मिळणार संधी
पुणे – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, अपक्ष अशी तिहेरी लढत रंगली. या तिघांसोबत अन्य सहा असे एकूण नऊ जणांचे भवितव्य सोमवारी (दि. 21) मतदारराजाने मशीनबंद केले आहे. त्यामुळे आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती निकालाची. निकाल गुरुवारी (दि. 24) जाहीर होणार असून त्या दृष्टीने प्रशासनाची मतमोजणीची पूर्ण तयारी झाली आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व कल तर दुपारी 12.30 पर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होऊन कोण “किंग’ झाला हे समजेल असा अंदाज आहे. त्यामुळे खेड विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन होणार की आजी-माजी आमदारांपैकी परत कोणाला संधी मिळणार यासाठी 48 तासांची कळ काढावी लागणार आहे.
जिल्ह्यात राजकीय व आर्थिकदृष्ट्या संवेदनशील असा मतदारसंघ म्हणून खेड-आळंदीकडे पाहिले जाते. एकाच मतदासंघात तीन नगरपालिका (राजगुरूनगर, चाकण, आळंदी) असलेला जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ आहे. तसेच चाकण औद्योगिक वसाहत, तीन धरणांसह निसर्गाने नटलेला हा परिपूर्ण असा मतदारसंघ असल्याने तो आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली होती. महायुतीत शिवसेनेकडे, तर महाआघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा या मतदारसंघात दबदबा असल्याने परंपरेप्रमाणे या दोन पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले होते.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे भाजपनेही चांगले पाय रोवल्याने भाजपने यंदा या मतदारसंघावर दावा केला होता. युतीधर्मामुळे तो न येऊ शकल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष तथा नायफड-वाशेरे जिल्हा परिषद गटाचे सदस्य अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत “अपक्ष’ उभे राहात शड्डू ठोकल्याने युतीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसले. यातूनही शिवसेनेने कच न खाता आमदार सुरेश गोरे यांच्या पाठिशी सर्व ताकद पणाला लावली. गोरे यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करायचेच यासाठी भाजपच्या काही मोजक्या तर आरपीआय आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले.
त्यात त्यांना यशही आले तरी पण युतीत झालेल्या बिघाडीचा फटका आमदार सुरेश गोरेंना बसणार की त्याचा फायदा होणार, याचे उत्तर गुरुवारी निकालानंतरच स्पष्ट होईल. दुसरीकडे आघाडीत बिघाडी न होता राष्ट्रवादीतील इच्छुकांसह कॉंग्रेस आणि अन्य मित्रपक्षांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांचा जोरदार प्रचार करून मतदारसंघात एकच राळ उडवली. दिलीप मोहिते यांनी “घर टू घर’ प्रचाराचे तंत्र अवलंबत मतदारांना साद घातली. ही साद त्यांना तारणार की युतीत झालेली बिघाडी त्यांना तारणार हे गुरुवारी निकालीअंती स्पष्ट होईल. तर अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्या पाठिशी भाजपचे अनेक नेते ठामपणे उभे राहात विरोधकांचे आव्हान परतवून लावत होते. त्यामुळे आजी-माजींवर अपक्ष भारी ठरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा आरोप-प्रत्यारोप, चिखलफेकींच्या फैरींनी गाजली. यात अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी आजी-माजी आमदारांवर आरोपांची “एके 47′ प्रमाणे फैरी झाडत होते. तर आमदार सुरेश गोरे या फैरी शांतपणे परतवून लावत होते. तर अधूनमधून घणाघातही करीत होते. माजी आमदार दिलीप मोहितेंवर विरोधक आरोप करीत ते पुन्हा आमदारकीसाठी योग्य नाहीत असे पटवून देत होते. याची माजी आमदार दिलीप मोहिते यांनी तर अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांची तेवढी दखल घेतलेली दिसली नाही. सत्तेत असूनही खेड तालुक्यासाठी आमदारांनी काहीच केले नाही, असे मतदारांना ते पटवून देत होते. तर या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत कोण “सरस’ ठरले आहे, या उत्तरासाठी गुरुवारपर्यंत कळ काढावी लागणार आहे.