वाघोली – हवेली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये विज बिल न भरल्या कारणाने पथदिवे बंद असून रात्री-अपरात्री महिला, नागरिक, मुले यांना प्रवास करणे जिकिरीचे झाले असून विशेषता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला असून महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारणार कोण असा सवाल वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी राज्य शासनाला केला आहे.
पूर्व हवेलीतील अनेक गावांमध्ये पथदिवे उभारणीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ग्रामपंचायतीकडून वीज बिलाचा भरणा न केल्याने महावितरण कडून पथदिव्यांची वीज जोडणी तोडण्यात आली असून अनेक गावे त्यामुळे अंधारात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. नोकरीच्या निमित्ताने जाणारे नागरिक महिला मुले यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची जबाबदारी घेणार कोण असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.
पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, पुणे महानगरपालिकेत गेलेल्या 23 गावांमधील अनेक गावांमध्ये देखील पथदिव्यांच्या वीज बिल भरणा करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विज बिल भरा अन्यथा अंधारात रहा अशी भूमिका महावितरण ने घेतल्यामुळे सर्वत्र अंधारमय चित्र पहावयास मिळू लागले असून राज्य शासनाने याबाबत तातडीने लक्ष देऊन जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून तातडीने महावितरण, ग्रामपंचायत तथा पुणे महानगरपालिकेत गेलेल्या गावांच्या बाबतीत वीज बिलाचा प्रश्न सोडवून सर्वांना दिलासा द्यावा अशी मागणी वाघोली च्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी केली.
याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे यांनी याबाबत तातडीने लक्ष देऊन योग्य ते निर्णय घेऊन घ्यावा अशी मागणी जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी केली आहे.