मुंबई – शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाची निवडणूक आयोगासमोर सुरु झालेली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगासमोर दोन्हही पक्षांनी आपले म्हणणे मांडले होते यावर निवडणूक आयोगाने देखील सर्व पक्षकारांचे दावे प्रतिदावे ऐकून घेतले होते. गेल्या सुनावणीत दोन्हही पक्षाचे सविस्तर म्हणणे ऐकल्यानंतर आयोगाने दोन्हही पक्षांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात देण्यासाठी मुदत दिली होती.
पुढील सुनावणी आज अर्थात ३० जानेवारी रोजी पार पडेल असेही आयोगाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता शिवसेना पक्षासह धनुष्यबाण चिन्हाचे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होऊन आयोग निकाल देणार की, अंतिम निकालासाठी आणखी एका तारखेची वाट पाहावी लागणार हे आज स्पष्ट होणार आहे. राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष आयोगाच्या निकालाकडे असणार आहे कारण पुढील निवडणूका लक्षात घेता हा निकाल राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे.
पक्ष फुटीच्या अनेक प्रकरणांमध्ये आतापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने कॉंग्रेस, स्वाभिमानी आणि लोजपसह अनेक पक्षांचे चिन्ह गोठवल्याचा इतिहास आहे. यामुळे सद्यपरिस्थिती पाहता केंद्रीय निवडणूक आयोगापुढे चिन्ह गोठवण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याचे अनेक घटनातज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काय झाले होते या पूर्वीच्या सुनावणीमध्ये
याआधी 20 जानेवारी रोजी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते. तसेच याबाबतची पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी घेण्याचे निश्चित केले होते. विशेष म्हणजे 23 जानेवारी याच दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुखपदाचा उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.