– मुकुंद ढोबळे
शिरूर तालुक्यात पोलीस खाक्याच गायब झाला आहे. त्याची जागा भ्रष्टाचाराने घेतल्याने तालुक्यात गुन्हेगारी सुसाट धावत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. शिरूर तालुक्यात औद्योगिक वसाहतीमुळे भाई, दादांची चलती सुरू आहे. हेच भाई, दादा आता पांढऱ्या कपड्यातील पुढारी झाले आहेत. कायदा- सुव्यवस्था असून नसल्यासारखी झाली आहे.
शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील तिन्ही पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांचा पोलीस खाक्या राहिला नसल्याचे दिसत आहे. पोलीस स्टेशनमध्ये कुठला गुन्हा करा आणि आरोपी पोलिसांना लगेच मिळत नाही. त्यामागे अर्थकारण कारणीभूत आहे. किरकोळ भांडण करा, जिवे मारण्याचा प्रयत्न करा, खून अथवा दरोडा टाका. पोलिसांनी अटक करताच त्याला सर्वासमोर किरकोळ पोलीसी खाक्या दाखवतात. त्यामुळे आरोपी आणि नातेवाईक घाबरतात. पोलीस आणि नातेवाइक यांच्यात चिरीमिरी घेऊन आरोपीची बडदास्त ठेवली जाते.
काही गुन्ह्यात आरोपी हा पोलिसांचा जावई आहे, अशी त्याची बडदास्त ठेवली जाते. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपी हा जरी उशीरा जामीनवर सुटला तरी त्याला अटकेच्या कार्यकाळात धाक वाटावा, अशी वागणूक मिळत नाही. त्यामुळे बाहेर आल्यावर त्याच्या वर्तणुकीत फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला प्रशानातील काही अधिकाऱ्यांमुळे बळ मिळत आहे. सध्या पोलीस खात्यात बजबजपुरी माजली आहे. याला वेळीच वेसण घालणे गरजेचे आहे.