संतोष पवार
सातारा – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी रोज नवी नावे समोर येत असून अध्यक्षपद कोणाला मिळणार, याचीच उत्सुकता लोकांना आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी (दि. 30) होत आहे. या विस्तारात सातारा जिल्ह्यातील कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, यावर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींच्या निवडी ठरणार आहेत.
या पदांसाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात हे पद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. जिल्हा परिषदेतील राजकीय स्थितीचा विचार केल्यास अध्यक्षपदाच्या शर्यतीत संजीवराजे, मसूरचे ज्येष्ठ नेते मानसिंगराव जगदाळे, शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार, मायणीचे सुरेंद्र गुदगे यांची नावे आघाडीवर आहेत.
कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत चांगल्या मताधिक्याने विजयी झालेल्या दीपक पवार यांच्याकडे सातारा-जावळी मतदारसंघात राष्ट्रवादी बळकट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दीपक पवार यांना अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपद देऊन ताकद देण्याचा प्रयत्न पक्षाकडून होणार आहे.
संजीवराजे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पदाधिकारी, अधिकारी, सदस्यांमध्ये समन्वय साधून चांगला कारभार केला. त्यामुळे पक्ष त्यांनाच पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे.
संजीवराजे यांनी जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केल्यान सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील सदस्यांमधूनही संजीवराजेच पुन्हा अध्यक्ष व्हावेत, असा सूर आहे. तसे असले तरी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवण्यासाठी राष्ट्रवादीतून आ. मकरंद पाटील व आ. बाळासाहेब पाटील यांच्यात रस्सीखेच आहे. आ. मकरंद पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास अध्यक्षपद संजीवराजे किंवा मानसिंगराव जगदाळे यांच्यापैकी एकाला मिळेल. आ. बाळासाहेब पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास आ. मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तसे घडल्यास मनोज पवार, शिरवळचे उदय कबुले यांची नावे चर्चेत असतील. आ. बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यास मानसिंगराव जगदाळे यांची अध्यक्षपदाची संधी हुकण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात ज्या मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळेल, त्या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्षपद दिले जाणार नाही, असे धोरण पक्षश्रेष्ठींनी ठरवल्याचे बोलले जात आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कमकुवत असेल तेथील सदस्याला अध्यक्षपद देऊन पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
त्यानुसार पाटण व सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाला प्राधान्य मिळू शकते. तसे झाल्यास शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार व दीपक पवार यांच्यापैकी एकाला अध्यक्षपद मिळू शकते. पक्षीय समतोल साधून प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादीची फळी भक्कम करण्याचा विचार करून अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीकडून नुकतच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीतील जिल्हा परिषद गटनिहाय आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. त्याची पडताळणी करूनच अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येतील, असे संकेत आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतिपदांसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.
महाविकास आघाडीचीही चर्चा
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद व पदाधिकारी निवडीतही महाविकास आघाडीचा प्रयोग होईल, असे वृत्त आहे. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असल्याने तेथे महाविकास आघाडी होईल, अशी शक्यता वाटत नाही. वरिष्ठ पातळीवरुन पक्षीय निर्णय झाल्यास शेंद्रे गटातील शिवाजीराव चव्हाण यांनाही ज्येष्ठत्वामुळे मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी चव्हाण यांनी फिल्डिंग लावली आहे.