जिल्हाध्यक्षपदाची 10 डिसेंबरपूर्वी निवड करण्यात येणार
नगर – भाजपने संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून नगर ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षपदाची 10 डिसेंबरपूर्वी निवड करण्यात येणार आहे. शहरचे जिल्हाध्यक्ष माजी खा. दिलीप गांधी व ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड हे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांची पुन्हा वर्णी लागणार की अन्य नेत्यांची निवड होणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
शहर जिल्हाध्यक्ष गांधी यांच्या कार्यकाळात महापालिकेत भाजपची सत्ता आली तर प्रा. बेरड यांच्या काळात जिल्ह्यात भाजपची मोठी वाढ झाली. नगरपरिषदा व अनेक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. या दोन्ही विद्यमान जिल्हाध्यक्षांच्या पदाची मुदत या महिन्या अखेरीस संपणार आहे. दि.1 ते 10 डिसेंबर या कालावधीत जिल्हाध्यक्षपदाची निवड होणार आहे.
त्या अगोदर दि. 10 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 15 ते 25 या कालावधीत बूथ अध्यक्ष व समित्यांची निवड करण्यात येणार आहे. 25 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी प्रदेशकडून निवडणूक अधिकारी व सहअधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.
शहर भाजपमध्ये माजी खा. दिलीप गांधी व ऍड. अभय आगरकर गटातील वाद जुनाच आहे. शहर जिल्हाध्यक्षपदाची 10 डिसेंबरपूर्वी तर मंडल अध्यक्षांची 30 नोव्हेंबरपूर्वी निवड केली जाणार आहे. या निवडींच्यावेळी गांधी व आगरकर गट आमनेसामने येणार असून या गटामधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे राधाकृष्ण विखे यांच्यासह दोन्ही कॉंग्रेसमधून काही दिग्गज नेते भाजपत निवडणुकीपूर्वी आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मताचा विचार या निवड प्रक्रियेत होणार का याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.