मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाने मुलींच्या लग्नासाठीचे वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता यासंदर्भातले विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच मंजुरीसाठी मांडले जाण्याची शक्यता आहे. मात्र,या प्रस्तावाला एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. तसेच वयाच्या १८ व्या वर्षी देशाचा पंतप्रधान निवडू शकतो, मग लग्न कधी करायचे हे सांगणारे तुम्ही कोण? असा थेट सवाल जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.
एक वृत्तवाहिनीशी बोलताना जलील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. इम्तियाज जलील म्हणाले, “मला मोदींना हा विचारायचं आहे की मुलींच्या लग्नासाठीचं वय वाढवून काय साध्य करणार आहेत? १८ वर्षांचं झाल्यावर मी देशाचा पंतप्रधान कोण होणार हे निवडू शकतो. आमदार-खासदार निवडू शकतो. १८ वर्षाचं झाल्यावर मी करारावर स्वाक्षरी करू शकतो. व्यवसाय सुरू करू शकतो. असं असताना केवळ लग्नासाठी हे विधेयक आणणं कितपत योग्य आहे? सरकारचा यामागे काय तर्क आहे हे त्यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे.”
“सरकारला आपल्या तरूण पीढित किती सामर्थ्य आहे, किती ऊर्जा आहे हे माहिती नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही १८ वर्षांचं झाल्यावर सर्व परवानग्या देत आहात मग लग्न कधी करायचं हे तुम्ही कोण सांगणारे?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला.