जिनेव्हा, दि. 15- करोनाने आतापर्यंत जगभरात 33 लाखांहून जास्त नागरिकांचे जीव घेतले आहेत. आता आपण करोनाच्या दुसऱ्या वर्षात आहोत. पण हे दुसरे वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक भयावह असेल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लसीकरण या दोन्हींच्या एकत्रित मदतीनेच आपण यातून बाहेर पडू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्लूएचओ) प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी दिला आहे.
डॉ. टेड्रॉस यांनी आज जगभरातील करोनाच्या संकटाबाबत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जगभरातील परिस्थितीसोबतच चालू वर्षात करोनाचा नि:पात करण्यासाठी कशा पद्धतीने पावले उचलणे गरजेचे आहे, याविषयी जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका त्यांनी मांडली.
लसीचा पुरवठा हे या काळामध्ये एक सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे. पण, जगातील काही प्रमुख लस उत्पादक देश यासंदर्भात इतर देशांना मदतीचे धोरण अंगीकारत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. लसींचा साठा काही देशांनी इतर देशांना पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच काही लस उत्पादक कंपन्यांनी लसीचा फॉर्म्युला देण्याचीही तयारी दर्शवली असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, भारतातील परिस्थिती चिंतेचा विषय असल्याची भूमिका यावेळी डॉ. टेड्रॉस यांनी मांडली. त्यासोबतच इतरही काही देशांमधील परिस्थितीवर भाष्य केले. भारतातील परिस्थिती अजूनही चिंतेचा विषय आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मृतांचे आकडे वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला मदतीचा हात दिला असून आत्तापर्यंत 1 हजार ऑक्सिजन सिलिंडर, तात्पुरत्या आरोग्य सेवांसाठी टेंट, मास्क आणि इतर वैद्यकीय गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत, असे टेड्रॉस म्हणाले.
पण, भारत हा तातडीने मदतीची गरज असलेला एकमेव देश नाही. नेपाळ, श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड आणि इजिप्तमध्ये देखील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटना या सगळ्यांना शक्य ती सर्व मदत देईल, असे टेड्रॉस यांनी यावेळी सांगितले.