शंभूराज देसाई, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांना आशा
सातारा – राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचा प्रयोग मूर्त स्वरूप घेत असल्याने राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदे मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्यातही हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्याला किमान दोन मंत्रिपदे मिळावीत, असा आग्रह असून शिवसेनेकडून आ. शंभूराज देसाई व राष्ट्रवादीकडून आ. मकरंद पाटील व कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांना यांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना व भाजपचे प्रत्येकी दोन तर कॉंग्रेसचा एक आमदार आहे. भाजपकडून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले शिवेंद्रराजे भोसले व आ. जयकुमार गोरे आता युतीचा काडीमोड झाल्याने विरोधी बाकांवर गेले आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून मकरंद पाटील व बाळासाहेब पाटील, कॉंग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण व शिवसेनेकडून शंभूराज देसाई यांची नावे मंत्रिपदासाठी
चर्चेत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा “मिस्टर क्लीन’ अशी असून त्यांना दिल्लीत व महाराष्ट्रातील राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. आ. शंभूराज देसाई यांनी यापूर्वी विधानसभेचे तालिकाध्यक्ष म्हणून काम केले होते, तसेच विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषणे करून सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळवला होता. आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणणारा नेता, अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी शिवसेनेचा भगवा पाटण तालुक्यात फडकत ठेवला असून त्यांच्या निष्ठेला उद्धव ठाकरे न्याय देतील, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या वाई विधानसभा मतदारसंघात आ. मकरंद पाटील यांनी विजयाची हॅट्ट्रीक नोंदवल्याने त्यांना मंत्रिपद मिळावे, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे. जिल्ह्यातून तब्बल पाच टर्म आमदार राहिलेल्या बाळासाहेब पाटील यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. बाळासाहेबांना कारखान्याच्या जवाबदारीतून मुक्त करा, असे सूचक विधान शरद पवार यांनी कराड दौऱ्यात केले होते.
शशिकांत शिंदेंचे पुनर्वसन शक्य?
जिल्ह्यावर असलेली राष्ट्रवादीची पकड लक्षात घेता पालकमंत्रिपदाच्या निवडीत पवारांचा निर्णय महत्त्वाचा असेल. शशिकांत शिंदे यांचे विधान परिषदेत पुनर्वसन करून त्यांच्याकडे पालकमंत्रिपद दिले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मात्र, शिवसेनेचा आग्रह राहिल्यास शंभूराज देसाई हेदेखील पालकमंत्री होऊ शकतात.
रामराजेंना संधी?
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यंदाच्या पक्षांतराच्या लाटेत सर्व राजकीय शक्यता तपासल्यानंतर सोयीने आपली पवार निष्ठा जाहीर केली होती. ते पवारांच्या पक्के लक्षात असे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत रामराजे नसतील, असे संकेत त्यांनी दिले होते. मात्र, राजकारण अशक्य असे काहीच नसते. त्यामुळे रामराजे यांचे राजकीय ज्ञान आणि अनुभव पाहता त्यांना संधी मिळेल, अशी चर्चा आहे.