मुंबई – सैन्य दलात “अग्निवीर’ या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. त्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट लेबर असेच म्हणू, पण, त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर्सचा कॉन्ट्रॅक्टर कोण असेल? असा खोचक सवाल गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजय वर्गीय यांनी भाजपची मानसिकता बोलून दाखविली. ते म्हणाले, जर मला भाजपने सर्व कार्यालयांचा सिक्युरिटी इंचार्ज केला. तर चार वर्षांनंतर जे अग्नीवीर बाहेर पडतील. त्यांना भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देऊ शकेन. म्हणजे काय तर वॉचमॅन!
या तरूणांचे नेमके काय करायचे ठरवले आहे. दुसरीकडे किशन रेड्डी नावाचे केंद्रीय मंत्री म्हणतात, या चार वर्षात त्यांना नाभिकाचे, धोब्याचे, ड्रायव्हरचे, इलेक्ट्रिशियनचे ट्रेनिंग मिळेल. म्हणजे सैन्यात या तरूणांना नाभिक, धोबी, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन बनविण्यासाठी नेणार आहात काय? हे सर्व सहा महिन्यांचे कोर्स आहेत, असा टोलाही त्यांनी लगविला.
भाजपच्या नेत्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना अग्निपथ आणि अग्निवीर याबद्दल काहीही माहिती नाही. हा प्रकार म्हणजे देशातील तरूणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न आहे. नियमित होणाऱ्या सैन्यभरती थांबवून हे थोतांड सुरू करणे, देशाला घातक ठरेल, असेही आव्हाड म्हणाले.