भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार, या चर्चेला उधाण आले आहे. युतीचा तिढा जसा गुरुवारीही सुटला नाही, तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचा फैसलाही झालेला नाही. परंतु सर्वच पक्षांनी येथून लढण्याची तयारी सुरू केली आहे.
राज्यातील सत्तारूढ शिवसेना-भाजप युतीचा जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. परिणामी, दोन्ही पक्षांचे नेते एका बाजूला युती होणारच असल्याची ग्वाही देत असतानाच दुसऱ्या बाजूला दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरूच ठेवली आहे. राज्य सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आता विधानसभा लढवायचा निर्णय पक्का केल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. सध्या शिवसेनेकडे असलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघ चंद्रकांत पाटलांच्या दृष्टीने अत्यंत “सेफ’ समजला जातो. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि क्षीरसागर यांनी “यावेळी आपण हॅट्ट्रिक करू’ असा विश्वास व्यक्त केला आहे
दुसरीकडे विद्यमान आमदार असलेला एकसुद्धा मतदारसंघ सोडणार नसल्याचे शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले आहे. जागांच्या अदलाबदल करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. युती होऊ दे अथवा नाही, मात्र, शिवसेनेची स्वबळाची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शिवसेनेच्या विद्यमान 6 जागा पुन्हा विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
2014 च्या निवडणुकीत भाजप उमेदवार महेश जाधव यांना झालेले 40 हजारांहून अधिक मतदान, या शहरी मतदारांचा भाजपकडे असलेला कल, मंत्रिपदाच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी असंख्य संस्था, तालीम, मंडळांना केलेली भरघोस मदत, सेवाभावी व मानवतावादी कार्य तसेच असंख्य खेळाडू व क्रीडा संघटनांना केलेली मदत यामुळे पाटील यांनी व्यक्तिगत स्तरावर “उत्तर’मध्ये खूप मोठे “गुडविल’ मिळविले आहे. त्यातच विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडे तगडा उमेदवारच नाही, अशी परिस्थिती आहे. दरम्यान, पाटील हे कोल्हापूर उत्तरसह चंदगड आणि राधानगरी, भुदरगड या मतदारसंघांचा विचारसुद्धा करत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
चंद्रकांत पाटील ज्या संभाव्य जागेवरून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, त्या जागा शिवसेनेकडे आहेत. मात्र, आता त्यांच्या उमेदवारीने शिवसेनेसह भाजप आणि विरोधी पक्षांतून इच्छुक असलेल्या उमेदवारांची घालमेल वाढली आहे. त्यामुळे आता युती होते की नाही आणि उमेदवारी कोणाला मिळते? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.