नवी दिल्ली (प्रतिनिधी) – माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. कॉंग्रेस अध्यक्षाचे पद रिक्त असताना पक्षाचे निर्णय कुणाकडून घेतले जात आहे? असा प्रश्न उपस्थित करीत सिब्बल यांनी चर्चा करण्याची मागणी केली आहे.
नवज्योतसिंग सिध्दू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे कॉंग्रेसचा असमाधानी गट “जी-23’च्या नेत्यांच्या अंगात बारा हत्तींचे बळ संचारले आहे. पंजाबमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा घेत कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
सिब्बल म्हणाले, कॉंग्रेसशासित राज्यांमध्येच नेतेमंडळी पक्ष सोडून जात आहे. ही परिस्थिती फक्त पंजाबमध्ये आहे असे नव्हे तर, ज्या-ज्या राज्यांमध्ये कॉग्रेसचे सरकार आहे तेथील नेत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. पक्षाची विद्यमान स्थिती आणि बेपत्ता अध्यक्ष अशी विचित्र स्थिती तयार झाली आहे. कॉग्रेसची धुरा पूर्णकालीन अध्यक्षाकडे नाही. अशात निर्णय कुणाकडून घेतले जात आहेत? हे कळायला पाहिजे, असे सिब्बल म्हणाले.
राहुल गांधी यांचे नाव न घेता सिब्बल पुढे म्हणाले की, आम्ही ‘जी-23’ गटाचे सदस्य आहोत. ‘जी हुजुर 23′ गटाचे सदस्य नाही. जी23 गटाच्या सदस्यांनी मागच्या वर्षी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात ज्येष्ठ पातळीवर बदल करण्याची मागणी केली होती.
सिध्दू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षात विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. कॉग्रेस कार्यसमितीची बैठक बोलावून चर्चा करण्याची मागणी केली आहे.
नेते पक्ष सोडून का जात आहेत? याचा विचार करण्याची गरज आहे. ही मंडळी आपल्या चुकांमुळे तर जात नाही ना? यावर आत्ममंथन करण्याची आहे. नेतृत्वाला जी मंडळी आपल्या जवळची वाटतात ते सर्व सोडून जात आहेत आणि ज्या मंडळींना परकेपणाची वागणूक दिली जात आहे ते अजूनही कॉग्रेसमध्येच आहेत’, ही खरी शोकांतिका आहे, असेही सिब्बल म्हणाले.
दरम्यान, सुष्मिता देव यांनी राष्ट्रीय महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी असताना अलिकडेच कॉंग्रेस सोडली होती. तसेच लुइजिन्हो फलेरो यांनीही पक्ष सोडला, हे येथे उल्लेखनीय.