मुंबई – क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण सहा तपासातून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना हटवण्यात आले आहे. वानखेडे यांच्या जागी आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय सिंह या प्रकरणांचा तपास करणार आहेत. ओडिशा केडरचे आयपीएस संजय सिंह यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत संजय सिंह?
संजय सिंग हे 1996 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) ओडिसाचे अधिकारी आहेत. सध्या ते दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी ओडिशाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही पाहिले होते. त्यानंतर सिंह यांची दिल्ली एनसीबी कार्यालयात बदली झाली होती. संजय सिंह यांनी ओडिशा राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ओडिसामध्ये पोलिस आयुक्तालयातील ड्रग टास्क फोर्स (डीटीएफ) चे प्रमुख असताना सिंह यांनी राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करणारे रॅकेट फोडण्यासाठी अनेक अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली होती. त्यानंतर संजय सिंह यांना सरकारने बढती देत दिल्ली कार्यालयात बदली केली होती. ओडिसामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. अतिरिक्त आयुक्तपदी असताना त्यांनी ड्रग टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून अनेक अंमली पदार्थांचे व्यवहार उघडकीस आणले होते. एनसीबीचे उपसंचालक म्हणून संजय सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थ आणि गांजाच्या व्यापाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने संजय कुमार सिंह (आयपीएस) यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या उपमहासंचालक पदावर नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या आदेशानुसार, सिंह यांची नियुक्ती प्रतिनियुक्तीवर करण्यात आली आहे. त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून, 31 जानेवारी 2025 पर्यंतच्या म्हणजे त्यांच्या सेवानिवृत्तीची तारीख किंवा पुढील आदेश येईपर्यंत ते एनसीबीचे उपसंचालक म्हणून काम पाहतील.
दरम्यान, समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समीर वानखेडेला आर्यन खान केससह ५ प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आलं. अशी २६ प्रकरण आहेत ज्यांचा योग्य तपास करणं गरजेचं आहे. ही एक चांगली सुरुवात आहे. सिसस्टीम साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”, असे नवाब मलिक यांनी ट्वीट करून म्हंटले आहे.
मला चौकशीतून हटवले नाही – समीर वानखेडे
आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आल्याच्या वृत्तावर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “मला चौकशीतून काढून टाकण्यात आलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी व्हावी, अशी माझी न्यायालयात रिट याचिका होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाची दिल्ली एनसीबीची एसआयटी चौकशी करत आहे. हे दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी टीम्स दरम्यानचा परस्पर समन्वय आहे,” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.