आमदार, संबंधित विभागाकडून कार्यवाही गलितगात्र
केंदूर -चौफुला ते केंदूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. करंदी येथील मारुती मठ ते मुखई रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत अनेकवेळा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. कामाचा दर्जा सुधारण्यासाठी मिनतवाऱ्या केल्या होत्या. मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे वारंवार गावकारभाऱ्यांनी तक्रार केली होती. मात्र याचा अद्यापही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे ठेकेदारांवर मोहमाया कोणाची आहे, असा संतापजनक सवाल नागरिकांनी केला आहे.
दहा महिन्यांपासून चौफुला ते केंदूर रस्त्याचे काम मंदगतीने सुरू आहे. पुढे काम सुरू आहे तर मागे लगेचच तोच रस्ता पुन्हा उखडला जात आहे. पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत आहेत. करंदीच्या कंत्राटदाराने तर कामालच केली आहे. मुरूमाऐवजी माती टाकून काम चालवल्याचे युवकांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी काम बंद करण्याच्या कंत्राटदाराला सूचना दिल्या. मंत्री वळसे पाटील यांच्याकडे पुन्हा तक्रार केली. मात्र ठेकेदारांवर काडीचीही उपयोग झाला नाही. चौफुला ते केंदूर आठ किलोमीटर रस्त्याला तब्बल दहा महिने उलटून गेले आहे.
मात्र अजूनही रस्त्याचे काम सुरूच आहे. रस्त्यालगत महेश गॅस कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे, या कंपनीने रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी पाइप टाकून ठेवले आहेत. पाइप गाढण्यासाठी व जोडण्यासाठी वापरात येणारी वाहने जेसीबी, ट्रॅक्टर, जनरेटर रस्त्यावरच उभे असल्याने रस्त्यावरून वाहने चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि प्रवाशी संताप व्यक्त करीत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नेहमीच किरकोळ अपघात होत आहेत. एकाचवेळी दोन वाहने आल्यावर चालकांची तारांबळ उडत आहे.