लखनौ – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतीविषयक कायद्यांबाबत खोटा प्रचार केला जात आहे. ज्यांनी पूर्वी विदेशी कंपन्यांच्या आणण्याबाबत कायदे केले होते तेच आता शेतकरी आणि स्थानिक कंपन्यांमध्ये भीती पसरवत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
उत्तरप्रदेशात बाहारिच इथे सुहेलदेव यांच्या पुतळ्याची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते झाली. त्यावेळी ते बोलत होते. पूर्वीच्या शासनांनी नेत्यांचा योग्य आदर केला नव्हता. ही चूक सुधारण्याचा प्रयत्न आपले सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतीविषयक कायद्यांद्वारे करण्यात आलेल्या सुधारणांद्वारे लघु आणि किरकोळ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या कायद्यांविरोधात केला जात असलेला खोटा प्रचार उघड करण्यास शेतकऱ्यांनीच सुरुवात केली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही आठवड्यांपासून शेतकरी संघटना या कायद्याविरोधात धरणे आंदोलन करत आहेत, त्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांनी ही टीका केली. या कायद्यांमुळे मोठ्या खासगी कंपन्याच शेतमालाचा भाव ठरवतील असा प्रचार केला जात आहे.
मात्र या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल खासगी कंपन्यांना विकण्याचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे. हा शेतमाल पूर्वीप्रमाणेच सरकारी यंत्रणांकडून विकत घेणे सुरूच राहणार आहे, असे स्पष्टिकरणही पंतप्रधानांनी दिले.
विदेशी कंपन्या कृषी क्षेत्रामध्ये कोणी आणल्या हे सर्व देशाने बघितले आहे. तेच आता स्थानिक कंपन्यांच्या नावाने शेतकऱ्यांना घाबरवत आहेत. अशाच प्रकारच्या कृषी सुधारणा कायद्यांचे समर्थन अन्य पक्षांनी पूर्वीच केले होते. मात्र त्यांनी या कायद्यांची अंमलबजावणी केलेली नव्हती, असा दावा भाजपने पूर्वी केला होता, असेही पंतप्रधान म्हणाले.
महाराजा सुहेलदेव यांच्या शौर्याची ऐतिहासिक पुस्तकांमध्ये दखल घेतली गेलेली नाही. मात्र अवध, तराई आणि पूर्वांचल या लोककथांमधून ते नेहमीच लोकांच्या हृदयात राहिले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वीच्या सरकारांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांचा योग्य सन्मान केला नाही, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.