लाहोर- पाकिस्तानात राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत इम्रान खान सरकार आणि लष्कराविरूध्द मोर्चा उघडला आहे. त्यातच आता आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ओढले जात आहे.
इम्रान खान आणि पाकिस्तानचे माजी पतंप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांच्यात आता वाकयुध्द सुरू झाले आहे. या दोन्ही नेत्यांनी स्वत:ला राष्ट्रभक्त सिध्द करण्यासाठी परस्परांना नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणवत टीकास्त्र सोडले आहे.
इम्रान यांनी नवाज शरीफ यांना मोदींचे मित्र अनेकदा म्हटले आहे. त्यांच्या या टीकेला आता मरियम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
त्या म्हणाल्या की आम्ही इम्रान खान यांना काही प्रश्न विचारला की ते म्हणतात की नवाज शरीफ यांची भाषा बोलतात. त्याला मरियम यांनी आक्षेप घेतला. उलट मोदींबाबत बोलण्यासाठी इम्रानच उतावीळ होतात. मोदींना यश मिळावे म्हणून तेच प्रार्थन करतात. कुलभूषण जाधव यांच्यासाठी रात्रीतून तेच अध्यादेश जारी करतात. त्यांच्यासाठी वकील शोधण्यासाठी तेच धावपळ करतात. काश्मीर एका ताटात वाढून भारतासमोर ती प्लेट तुम्हीच धरतात, काश्मीरच्या प्रश्नावर सुरू असलेल्या खटल्यात पराभव तुमचाच होतो. संयुक्त राष्ट्रात भारताच्या बाजूने मतदानही हेच करतात आणि वर आमच्यावर आरोप केला जातो की आम्ही मोदींच्या भाषेत बोलतो, असे टीकास्त्र मरियम यांनी इम्रान यांच्यावर सोडले आहे.
गेल्या आठवड्यात लंडन येथून एका सभेला ऑनलाइन संबोधित करताना नवाज शरीफ यांनी इम्रान यांच्यासोबतच पाकिस्तानी लष्कर, त्याचे प्रमुख आणि कुख्यात आयएसआय प्रमुखालाही लक्ष्य केले होते. शरीफ यांच्या त्या भाषणानंतर इम्रान खान अस्वस्थ झाले आहेत. विरोधी पक्ष त्यांना लष्कराच्या हातातील बाहुले म्हणून सातत्याने हिणवत आहेत. त्यामुळेही ते अस्वस्थ आहेत. त्यावरून इम्रान यांनी आता शरीफ यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.
नवाज शरीफ अशी भाषणे करून जगात पाकिस्तानला बदनाम करत आहेत. ते देशाची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप इम्रान यांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांकडून जे शक्तीप्रदर्शन केले जाते आहे, त्याला त्यांनी सर्कशीची उपमा दिली आहे.
नवाज यांनी पाकिस्तानी लष्करावर केलेली टीका ही देशाबाहेर बसून केली आहे. वास्तविक त्यांनी जनरल बाजवा यांना लक्ष्य केलेले नाही, तर ते पाकिस्तानच्या सैन्याला लक्ष्य केले आहे. हेच आरोप नरेंद्र मोदी करत असतात. त्यांनी त्यांना नवाज शरीफ आवडतात असे अनेक वेळा म्हटलेही आहे व पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना दहशतवादी म्हटले आहे. मात्र नवाज शरीफ यांच्यावर त्यांनी कधी प्रतिक्रिया दिलेली नाही याकडे इम्रान यांनी लक्ष वेधले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा आपण जगाला दाखवला आहे. त्यामुळेच ते इम्रान खान बरोबर आहेत असे कधीच म्हणणार नाही असा दावाही त्यांनी केला.