सांगली – महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांची कॅबिनेट तर कॉंग्रेसच्या विश्वजित कदम यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. दोन्ही नेते दिग्गज असल्याने जिल्ह्याचे पालकत्व कुणाच्या खांद्यावर येणार याची उत्कंठा सांगलीकरांना आहे.
युती सरकारच्या काळात सांगली जिल्हा मंत्रिपदाच्या बाबतीत पोरका होता. सुरुवातीच्या काळात चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगली व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सांगलीच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यामुळे सांगलीला पूर्ण वेळ पालकमंत्री न मिळाल्याने प्रशासनाचा गाडा हाकतानाअडचणी येत होत्या. त्यामुळे पालकमंत्रिपदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असावा, असा सूर जनतेतून उमटत आहे.
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात 12 जिल्ह्यांना स्थान मिळालेले नाही तर काही जिल्ह्यांना दोन-तीन मंत्रिपदे मिळाली आहे. सांगली जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे जिल्ह्याला स्थानिक लोकप्रतिनिधी पालकमंत्री म्हणून लाभणार आहे. मात्र, पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाणार की कॉंग्रेसकडे, याची उत्सुकता आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात पतंगराव कदम यांच्याकडे तब्बल 15 वर्षे सांगलीचे पालकमंत्रिपद होते. त्यांच्या पश्चात विश्वजित कदम यांच्याकडे पालकत्व येणार की, जयंत पाटील यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या हातात पूर्ण प्रशासकीय यंत्रणा असते. शिवाय जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्षपदही पालकमंत्र्यांकडे असते. त्यामुळे कार्यकर्त्यांची कामे करता येत असल्याने यामुळेच पालकमंत्रिपदाला विशेष महत्त्व आहे.
पालकमंत्रिपदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. कोल्हापूरमध्ये दोन मातब्बर नेत्यांमध्ये स्पर्धा आहे. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ व कॉंग्रेसचे सतेज पाटील या दोघांनीही पालकमंत्रिपदासाठी दावा केला आहे. सत्तेसाठी एकत्र आलेले तिन्ही पक्ष पालकमंत्रिपदांचा तिढा कसा सोडवणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांचे पारडे जड आहे. त्यांना जिल्ह्याची खडान्खडा माहिती आणि प्रशासनावर पकड आहे. ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीची नव्याने बांधणी करायची असल्याने पालकमंत्रिपद महत्त्वाचे आहे. दुसरीकडे भारती विद्यापीठ व अनेक संस्थांच्या माध्यमातून विश्वजित कदम यांचा जनसंपर्क जिल्हाभर आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाच्या चाव्या कोणाच्या हाती पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.