नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटी माहिती लोकांपुढे सादर करीत आहेत. जी माहिती लोकांपुढे सादर करायची त्याची सत्यता ते कधीच का पडताळून पहात नाहीत. मुळात त्यांना अशा खोट्या बातम्या पुरवतो कोण असा सवाल ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की भारतीय लष्कराने या आधी सीमा पार जाऊन कोणतीही कारवाई केली नव्हती हे असत्य त्यांनी सातत्याने पसरवले आहे वास्तविक मोदी सरकारच्या आधीच्या काळातही अशा कारवाया भारतीय लष्कराने केल्या आहेत. पण तरीही त्यांना हे सत्य मान्य नसेल तर त्यांनी या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून ही माहिती खरी की खोटी हे तपासून पाहिले पाहिजे.
राजीव गांधी यांच्या आयएनएस विराट सफारीबाबतही मोदींनी असेच असत्य पसरवले आहे. नौदलाच्या माजी वरीष्ठ अधिकाऱ्यांनीच या विषयीचा खुलासा केला असून राजीव गांधी यांचा आयएनएस विराट सफारीचा कार्यक्रम अधिकृत सरकारी कार्यक्रम होता असे स्पष्ट केले आहे.तरीही ते असत्य का सांगत राहातात आणि त्यांना ही खोटी माहिती पुरवतो कोण असा मला नेहमी प्रश्न पडतो असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.