शिवसेनेचा सामनामधून अमित शहांना सवाल
मुंबई : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या गांधी कुटुंबातील तीनही सदस्यांची एसपीजी कमांडोंची सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली असून केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली झेड प्लस सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे. आयबी आणि रॉ या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधी कुटुंबाच्या जिवाला असणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत आढावा घेतल्यानंतरच सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे होते. आता यावर शिवसेनेने सवाल उपस्थित केला आहे. गृहमंत्रालयाने असे ठरवले की, गांधी परिवाराला असलेला धोका कमी झाला आहे. गृहमंत्रालयास वाटते म्हणजे नक्की कुणास वाटते? असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिल्ली असेल किंवा महाराष्ट्र, वातावरण निर्भय असावे, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांना बेडरपणे काम करता यावे असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. तशी स्थिती व वातावरण निर्माण झाले असेल तर गांधी परिवाराची सुरक्षा काढायला हरकत नाही. पण पंतप्रधान, गृहमंत्री, मंत्री व इतर सत्ताधारी पुढारी सुरक्षा पिंजरे
सोडायला तयार नाहीत व बुलेटप्रूफ गाडयांचे महत्त्व कमी झालेले नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. आपल्या सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेनं याद्वारे अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. गांधी कुटुंबाच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नास आधार आहे. गांधी परिवाराच्या सुरक्षा ताफ्यात जुन्या गाड्या पाठवल्याच्या बातम्याही चिंताजनक आहेत. धोक्याची घंटा वाजत असेल तर पंतप्रधान मोदी यांनी त्यात लक्ष घातले पाहिजे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.