कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांमध्ये संभ्रम : लहामटेंना बाजूला ठेवून भांगरेंचा प्रचार
अकोले – निवडणूक प्रचाराचा ज्वर आता वाढू लागला आहे. भाजपचे उमेदवार वैभव पिचड यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा अट्टहास करून राष्ट्रवादी कॉंग्रेसने डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी दिली खरी पण सध्या आघाडीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांमध्ये मात्र आघाडीच्या उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. डॉ. लहामटे की अशोक भांगरे असाच प्रश्न उद्भवत आहे. कारण उमेदवार लहामटे बाजूला ठेवून भांगरे स्वतःचा डंका पिटवित आहेत.
मी असा मी तसा असे सांगून भांगरे उमेदवाराचा नाही तर स्वतःचा प्रचार करीत असल्याचे दिसत आहे. महायुतीचे उमेदवार वैभव पिचड तर आघाडीचे डॉ. किरण लहामटे उभे आहेत. मात्र या निवडणुकीत मार्गदर्शक म्हणुन पुढे आलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे हे सामान्य मतदारांमध्ये कायम मिळून – मिसळून राहिलेले आहेत.
त्यामुळेच आजही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रचाराची एकूणच निवडणुकीचे ध्येय साध्य करण्याची लगबग लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यास व गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे नियोजन अशोक भांगरे यांनी केले. सभेची गर्दी जमवणे, त्याचे व्यवस्थापन करण्यापासून तर त्या सभेला रुपडे प्राप्त करून तिचे व्यवस्थापन करण्यापर्यंत सिंहाचा वाटा भांगरेंचा राहिला. तर त्यानंतर उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने डॉ. लहामटे यांना उमेदवारी दिली. काही काळ अशोक भांगरे हे स्तब्ध राहिले.
पण त्यानंतर ते स्वतः व त्यांचे कुटुंबिय सावरले आणि त्यांनी आता निवडणुकीचा ताबा घेतला आहे. त्यामुळे सामान्य मतदारांमध्ये आजही नेमका उमेदवार कोण भांगरे की लहामटे हा संभ्रम कायम राहिला आहे. जेव्हा जेव्हा मतदारांशी संपर्क साधला तेव्हा अशोक भांगरे हे उमेदवार असल्याचे हे अशिक्षित,अनपढ मतदारांकडून सांगण्यात आले. पडद्यावर एक आणि पडद्यामागील मात्र वेगळाच माणूस ही गोंधळाची स्थिती आता संपवण्याची गरज आहे.
त्या भांगरे यांनी डॉ. लहामटे यांना समोर आणणे आवश्यक असतांना त्यांना बाजूला ठेवू ते स्वतःची महती सांगत आहे. त्यामुळे उमेदवारबद्दल माहितीच सर्वसामान्यापर्यंत जात नसल्याचे चित्र आहे. शिवाय आघाडीचा धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा सर्व प्रचाराचा ताबा भांगरे व त्यांच्या समर्थकांनी घेतला आहे. किंवा पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेसजनांनी घेतला असल्याची भावना असल्याने त्याबाबतही उलट-सुलट चर्चा सुरू आहे. डॉक्टर निवडून यावेत यासाठी सर्व आटापिटा असला तरीही गोंधळाची मतदारांमध्ये असलेली संभ्रमावस्था मात्र संपवण्याची गरज आहे.