मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेना, मातोश्री, संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना आणि टिकेला विनायक राऊत यांनी उत्तर दिले आहे.
ते म्हणाले की, आज पत्रकारपरिषदेत देखील नारायण राणेंनी अत्यंत पोरकट आरोप केले आहेत. परंतु दुसऱ्यावर खूनाचे आरोप करत असताना राणेंना कदाचित त्यांच्या वाढत्या वयामुळे आता विस्मरण होत असेल, मुलांच्या उपद्व्यापामुळे त्यांना खूप मानसिक त्रास होत असेल. त्यामुळे कदाचित त्यांना त्यांचा भूतकाळ आठवत नसेल. तर मला तो त्यांना आठवण करून द्यावा लागेल.
इतरांवर आरोप करण्याच्या ऐवजी सिंधुदुर्गमध्ये ज्या पद्धतीने नारायण राणेंच्या कारकीर्दीत खून, दरोडे, मारामारी, लुटमार, खंडणी अशा पद्धतीचे जवळपास 9 वर्ष प्रकार होत होते आणि मग रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर या सगळ्यांचे निर्घृणपणे केलेले खून, हे कोणी केले? आणि कोणी कशा पद्धतीने पचवले. श्रीधर नाईक यांच्या खूनामध्ये तर प्रत्यक्ष आरोपी, म्हणून कोण होते हे आम्हाला देखील जाहीरपणे उघड करून सांगण्याची वेळ आणू नये.