-हेमंत देसाई
2019च्या लोकसभा निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यापासून, अखिलेश तर अदृश्यच आहेत. त्यांच्या सायकलयात्राही सातत्याने लांबणीवर पडत आहेत. वास्तविक योगींना खरे आव्हान अखिलेशच देऊ शकतात, असे अनेकांचे मत आहे. म्हणूनच त्यांनी अधिक सक्रिय होण्याची गरज आहे.
गेल्या 14 सप्टेंबर रोजी, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. आरोपींनी मुलीच्या पाठीचा कणा मोडला आणि तिची जीभदेखील छाटली. 29 सप्टेंबर रोजी उपचार सुरू असताना, दिल्लीत पीडितेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिला हाथरस येथे आणून, तिच्या घरच्यांना घरातच कोंडून, तिचा परस्पर अंत्यविधी उरकण्यात आला. माणुसकीला काळिमा लावणाऱ्या या घटनेबद्दल देशभर संताप व्यक्त झाला आणि ठिकठिकाणी निदर्शने झाली.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी हाथरसमध्ये जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पोलिसांनी ढकलले व धक्काबुक्की केली. मात्र, यामुळे निराश न होता, दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पीडितेला भेटण्यासाठी हटून बसले आणि त्यांच्यापुढे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नमावे लागले. त्यांना भेट देण्याची परवानगी द्यावी लागली.
सत्तेवर येताच, योगी सरकारने अनेक बनावट चकमकी घडवून गुंडांना ठार मारले. त्यामुळे गुंडगिरीस आळा बसेल, ही आशा फोल ठरली. उलट रोजच्या रोज बलात्काराच्या घटना घडतच आहेत. चोऱ्या, अपहरण यातही घट झालेली नाही. केंद्र सरकारने ज्या अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, त्यांचेच ढोल वाजवून योगी सरकार फुकटचे श्रेय घेत आहे. मात्र, दिवसेंदिवस सरकारची लोकप्रियता घसरत चालली आहे. त्यामुळे हाथरसची घटना असो वा नागरिकत्व कायद्याविरुद्धचे आंदोलन असो. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना अटक करायची आणि प्रत्येक घटनेमागे परकीय हात असल्याची दवंडी पिटायची, ही या सरकारची पद्धत आहे. 2022 साली पुन्हा उत्तर प्रदेशात भाजपचाच विजय होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहोत, असे योगीजींना वाटत आहे.
2017 साली भाजपला 403 पैकी 312 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी समाजवादी पार्टी व कॉंग्रेस आणि बहुजन समाज पार्टीने योगीजींच्या विरोधात स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे मतविभागणी होऊन भाजपला लाभ झाला. 2022 साली तर, समाजवादी पार्टी, कॉंग्रेस व बसपा हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अशा चौरंगी लढती झाल्यास आपल्याला विजय मिळेल असा भाजपला विश्वास आहे. अशा परिस्थितीतदेखील जर भाजप विरोधात तीव्र लाट असेल, तरच त्यांचा पराभव होऊ शकतो. योगीजींच्या विरुद्ध जनमत होऊ लागले असले, तरी अद्याप नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता शाबूत आहे, असे वेगवेगळ्या पाहण्या सांगतात. या पार्श्वभूमीवर, विरोधकांचे नशीब चांगले असेल, तर फार फार तर त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल. मग आघाडी सरकार स्थापन करावे लागेल. तसे घडू नये म्हणून योगीजींनी आक्रमक पवित्रा धारण केला असून, म्हणूनच हाथरसमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांना व नेत्यांना मारहाण करण्यात आली.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांना अटक करण्यात आली. प्रियांका गांधी यांना जास्त प्रसिद्धी मिळू नये, यादृष्टीनेही उत्तर प्रदेशातील भाजप सरकारचे प्रयत्न सुरू असतात; परंतु हाथरसची घटना घडली, तेव्हा सपा अध्यक्ष अखिलेश यादव लंडनमध्ये होते. मायावतींनी उशिरा प्रतिक्रिया दिली. त्यामुळे सर्व श्रेय राहुल-प्रियांका यांना मिळाले. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रियांका राज्यात अधिक सक्रिय राहिल्यास, तेथे कॉंग्रेसचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. अशावेळी योगी विरुद्ध प्रियांका अशी अध्यक्षीय पद्धतीची निवडणूक झाल्यास, त्यात रंगत उत्पन्न होईल; परंतु या सापळ्यात भाजप अडकण्याचा संभव कमी आहे. कारण भाजप योगींच्या नावे नव्हे, तर मोदींच्या नावे मते मागणार आहे.
उलट आगामी विधानसभा निवडणूक योगींच्या विरोधात मते मागण्यासाठी लढवली आणि तसा प्रचार केला, तरच विरोधकांचा फायदा होऊ शकतो. राम मंदिर, तिहेरी तलाक, 370वे कलम, चीनची घुसखोरी, पाकिस्तानचा दहशतवाद किंवा उज्ज्वला वा जनधन योजना या मुद्द्यांवर निवडणूक न लढवता, तुम्हाला योगी हवेत की मायावती, अखिलेश किंवा प्रियांका, असा पर्याय लोकांसमोर ठेवणे, हे विरोधकांच्या हिताचे आहे. चौरंगी लढतीत तिन्ही विरोधी पक्षांना आपापला नेता विरुद्ध योगी, असे लढतीचे चित्र तयार करावे लागेल.
आज उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती पूर्णपणे बिघडली आहे. माझ्या काळात गुंडांचा कसा बंदोबस्त केला होता, हे मायावती सांगू शकतात. ठिकठिकाणी हत्ती (पक्षाचे निवडणूक चिन्ह) आणि स्वतःचे पुतळे उभारल्याबद्दल मायावतींवर टीका झाली होती; परंतु मग मोदींनीही गुजरातमध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर तीन हजार कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, या पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचे पहिल्याच वर्षी आढळून आले होते. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांची जंत्रीही मायावती देऊ शकतात. केवळ जातीचे राजकारण न करता, मायावतींनी प्रचारात आपण केलेल्या कामांची माहिती लोकांना दिली पाहिजे. केवळ संवर्णांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करून त्यांचा लाभ होणार नाही.
योगी सरकारमध्ये संवर्णांचे वर्चस्व असून, त्यामुळे यादवेतर ओबीसी दुखावले गेले आहेत. कॉंग्रेसकडे लल्लूंसारखा तळागाळात काम करणारा नेता आहे; परंतु उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात त्यांचे नाव फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे प्रियांका यांनी आता आपला मुक्काम लखनौला हलवूनच काम केले पाहिजे.