जिनव्हा – भारतातील भयावह कोरोना लाटेसाठी विषाणूचे केवळ एक म्युटेशन जबाबदार नसून त्यामागे अनेक कारणे आहेत. वास्तविक पहिली लाट ओसरताच मोठमोठ्या सभा, प्रचंड गर्दीचे सोहळे, कोरोनाचे अनेक व्हेरिएंट आणि मंदगतीने होणारे लसीकरण यामुळे भारतातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे परखड मत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नोंदवले आहे
भारतात आलेल्या कोरोना सुनामीसाठी केवळ एक म्युटेशन जबाबदार नाही. कोरोनाचे नियम पाळले नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या काही आठवड्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडण्याच्या मार्गावर आहे, अशा शब्दांत डब्ल्यूएचओचे प्रवक्ते तारिक जसारेव्हिव यांनी लक्ष वेधले.
कोरोना रुग्णांपैकी केवळ १५ टक्के लोकांना रुग्णालयात उपचारांची गरज पडते. त्यामध्येही अत्यंत कमी रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. मात्र योग्य माहिती मिळत नसल्याने भारतात लोक आपल्या नातेवाइकांना रुग्णालयात भरती करण्याची घाई करीत आहेत. ८५ टक्के रुग्णांवर घरीच उपचार केले जाऊ शकतात.
लोकांना घरगुती उपचाराविषयी माहिती देणे गरजेेचे आहे, असे तारिक म्हणाले. तर अध्यक्ष तेद्रोस घेब्रयासिस म्हणाले की, भारताला ४००० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचा पुरवठा केला जाणार असून २ हजार तज्ज्ञांचा ताफाही भारतात पाठवला जाणार आहे.