मुंबई – पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनामा नाट्यानंतर शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हेच समीकरण असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर विविध पक्षांनी आणि नेत्यांनी याबाबत आपली मते व्यक्त केली. “शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले” अशी टीका सामानातून करण्यात आली होती. आता या टीकेला स्वतः पवारांनी उत्तर दिले आहे.
शरद पवार म्हणाले की, “अग्रलेख माझ्या वाचनात आलेला नाहीये. सामना किंवा त्याचे संपादक हे सगळे आम्ही एकत्र काम करतो. एकत्र काम करताना पूर्ण माहितीवरच भाष्य करणं योग्य होईल. अन्यथा गैरसमज होतात. पण माझी खात्री आहे की त्यांची भूमिका ही ऐक्याला पोषक असेल.” तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मला निर्णय बदलावा लागल्याचे देखील यावेळी पवारांनी स्पष्ट केले.
काय म्हटलंय सामनात नेमकं
“पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला आणि प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला,” असं सामनात म्हणटलंय.