पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसाची भेट म्हणून नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले आणि मध्य प्रदेशातील कुनो या अभयारण्यात सोडण्यात आले. सत्तर वर्षांपूर्वी जो प्राणी भारतातून नामशेष झाला होता तो प्राणी पुन्हा एकदा भारतात येणे ही आनंदाची गोष्ट असली, तरी याच जोडीला भारतात सध्या जी वन्यसंपदा आहे त्याचे जतन करण्यासाठीसुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे.
जगातील सर्वात आदर्श असलेली भारताची ही जैवविविधता गेल्या काही वर्षांमध्ये संकटात आली आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. केंद्र सरकारने परक्या देशातील चित्त्यासारखे प्राणी भारतात आणणे असोत किंवा मुंबईतील प्राणी संग्रहालयासाठी पेंग्विन सारखे पक्षी आयात करणे असो या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या, तरी मुळात जी भारताची जैवविविधता आहे ती जपण्यासाठी आपण काय करणार आहोत ते ठरवणे जास्त महत्त्वाचे आहे. सरकारने गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने भारतातील वाघांची संख्याही वाढली आहे जी एकेकाळी दीड हजारापेक्षाही कमी होती; पण प्रोजेक्ट टायगर सारखे प्रकल्प राबवून वाघाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात आतापर्यंत सर्वच सरकारांना यश आले आहे. असाच विचार इतर सर्व वन्यसंपदेबाबत करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, हत्ती हे भारताचे सर्वात मोठे सांस्कृतिक लक्षण मानले जाते; पण आता भारतीय हत्ती जो आशियाई हत्ती या नावाने ओळखला जातो तो सध्या नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या लिस्टमध्ये अग्रक्रमाने आहे.
नैसर्गिक अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग असलेले गरुड, गिधाडे आणि वटवाघळे यासारख्या पक्ष्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागली आहे. महानगरांमध्ये मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्यामुळे शहरांमध्ये चिमण्यांचा चिवचिवाट आणि कोकीळ पक्ष्यांची कुहू कुहू कमी झाली आहे. भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या चिमण्या गेल्या तरी कुठे, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. चिमण्या, कावळे इतर पक्षी किंवा माकडासारखे प्राणी हे शहरी जीवनामध्ये माणसाच्या सोबत सहजीवन जगत असतात; पण वन्यसंपदा म्हणून ओळखली जाणारी जी जीवसृष्टी आहे ती वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील विविध राज्यांमधील अनेक शहरांचा विचार करता दररोज कोणत्या ना कोणत्या शहरांमध्ये बिबट्याचा वावर सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. बिबट्याला आपले जंगल सोडून शहरात का यावे लागले याचाही विचार यानिमित्ताने करावा लागणार आहे. बिबट्याचे जे घर होते त्या जंगलात माणसाने अतिक्रमण केल्यानेच बिबट्याला भक्ष्याच्या शोधासाठी शहरांमध्ये यावे लागत आहे.
केवळ बिबट्या नव्हे तर हरीण, मोर आणि काही वेळेला सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्येच रमणारा गवा हा प्राणीसुद्धा मानवी वसाहतीमध्ये आलेला दिसतो. महापुराच्या स्थितीत अनेक वेळा नद्यांमध्ये आढळणाऱ्या मगरीसुद्धा शहरातील रस्त्यावरून फिरताना दिसू लागल्या आहेत. वन्य जीवनाचा भाग असणारी वनस्पतीसुद्धा नामशेष होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ज्या ठिकाणी मानवी पावले पडत आहेत त्या ठिकाणची वनसंपदा नष्ट होण्याचा धोका वाढत आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार यूनोच्या जागतिक हेरिटेज यादीमध्ये आहे. त्या कास पठारावर सापडणाऱ्या फुलांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीयदृष्ट्या कमी झाले आहे, हा धोका यानिमित्ताने लक्षात घ्यावा लागणार आहे. परदेशातून चित्ते किंवा पेंग्विन आणणे यासारखे प्रयोग करून काही दिवस प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा ही जी भारताची जैवविविधता आहे ती जपण्यासाठी आपण काय करणार आहोत, हे समोर आणणे जास्त महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये भारतातील अनेक प्राणी संपूर्णपणे नामशेष झाल्याचे दिसून येते, तर आता काही प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हत्तीपाठोपाठ सिंह आणि गेंडा ही भारतीय जीवसृष्टीची महत्त्वाची लक्षणे मानली जातात. पण सध्या सिंहासारखा प्राणी फक्त गुजरातमधील गीर अभयारण्यापुरता मर्यादित राहिला आहे तर गेंडा हा प्राणी आसाममध्ये काझीरंगा प्रदेशातच आढळतो. अर्थात या प्राण्यांना ज्या प्रकारचे वातावरण मानवते त्या वातावरणामध्ये हे प्राणी वाढत असल्याने त्याच ठिकाणी त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे असते. पण याच प्रदेशांमध्ये जर मानवी अतिक्रमणामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले तर इतरत्र कोठेही त्यांचे संवर्धन करणे शक्य होत नाही, ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसादिवशी जेव्हा पिंजऱ्याचे दार वर करून त्या आयात चित्त्याना जंगलात सोडले तेव्हा त्या पिंजऱ्यातून बाहेर आल्यानंतर चित्तेसुद्धा गोंधळलेले दिसले. कारण सर्व वातावरणच त्यांच्यासाठी नवीन होते. त्यामुळे जरी कोट्यवधी रुपये खर्च करून हे चित्ते भारतीय जंगलांमध्ये आणण्यात आले असले, तरी त्यांचे व्यवस्थित संवर्धन करणे हेसुद्धा एक आव्हान ठरणार आहे. हवामान, आहार आणि इतर सर्वच बाबतीत या चित्त्यांसाठी भारतीय परिस्थिती आफ्रिकेतील परिस्थितीपेक्षा भिन्न असणार आहे. या परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी काही काळ जाणार आहे. या काळामध्ये त्यांना जपण्याची गरज आहे. अशाच प्रकारचे धोरण भारतात अस्तित्वात असलेल्या अनेक प्राण्यांबाबतही सरकारला राबवावे लागेल. ज्या मोठ्या प्रमाणात सध्या बिबट्या, गवे किंवा हरणासारख्या प्राण्यांचे जंगलातून शहरांमध्ये स्थलांतर होत आहे ते पाहता जंगलावरील माणसाचे अतिक्रमण कमी करण्यावरच आता भर द्यावा लागणार आहे. प्राण्यांचा अधिकृत अधिवास असलेल्या जंगलांमध्ये माणसाने अतिक्रमण केल्यानेच माणसाचा अधिवास असलेल्या शहरांमध्ये जंगली प्राण्यांना यावे लागत आहे, ही साधी बाब आता विसरून चालणार नाही. साहजिकच बाहेरच्या देशांमधून चित्ते किंवा पेंग्विन यासारखे
प्राणी भारतात आणण्याच्या प्रयोगांचे स्वागत करत असतानाच भारतातील वन्य संपदेचे संवर्धन करण्यासाठी जर एखादी ठोस योजना आखण्यात आली तर त्याचेही स्वागतच आहे.