अकोले – आज आघाडीकडून प्रचारक व उमेदवार असलेले, आम्ही जेंव्हा राष्ट्रवादी पक्षात होतो, तेंव्हा शरद पवार यांना शिव्या शाप देत होते. तसेच भाजपचे गुणगान गात होते. आम्ही जेंव्हा भाजपचे उमेदवार म्हणून उभे आहोत, आता ते पवारांचे गुणगान करून भाजपवर टीका करीत आहेत. अशा रंगबदलू माणसांना जागा दाखवून द्या, असे आवाहन करताना अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांनी अशोक भांगरे व डॉ.किरण लहामटे यांचे नाव न घेता टीका केली.
अकोले तालुक्यातील रुंभोडी येथील मुख्य चौकात आज महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते देवराम सावंत होते. तेंव्हा ते बोलत होते. पिचड म्हणाले, सत्तेत नसल्यामुळे गत पाच वर्षांत विकासकामांना निधी उपलब्ध झाला नाही. शेजारील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. मात्र अकोले तालुक्याला जाणीवपूर्वक निधीपासून डावलले गेले. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी मला भाजपत प्रवेश करावा लागला. माझ्या समोर असलेल्या उमेदवाराकडे विकासाची दूरदृष्टी नाही. त्यामुळे अकोलेकर जनता त्यांना पदरात घेणार नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ यांनी आपली लढाई ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराशी नसून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराशी आहे, अशी खिल्ली उडवत, आमच्या उमेदवाराने पक्ष बदलला असं म्हणणाऱ्यांनी किती पक्ष बदलले? हे नागरिकांना माहीत आहे, असा अशोक भांगरे यांचे नाव न घेता टोला लगावला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार पिचड हे एक लाख मताधिक्यांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
माजी मंत्री मधुकरराव पिचड आपल्या भाषणात म्हणाले, ज्या देशाने मोदींना स्वीकारले, आपण त्यांना स्वीकारले आहे. तालुक्यातले काही नेते जे यापूर्वी मोदींचा जयजयकार करीत होते, ते आज त्यांच्याच विरोधात बोलताना आपण पाहतोय. मोदींच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे आपला देश खऱ्या अर्थाने स्वावलंबी व बलाढ्य झाला असल्याची कबूली पिचड यांनी दिली.
यावेळी ही टीका करतांना त्यांचा रोख दशरथ सावंत, अशोक भांगरे यांच्याकडे होता. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मीनानाथ पांडे, कैलासराव वाकचौरे, गुलाबराव शेवाळे, मच्छिंद्र धुमाळ, गोरख मालुंजकर, प्रकाश मालुंजकर, जयश्री सावंत, ईश्वर वाकचौरे, जे. डी. आंबरे आदी उपस्थित होते.