नवी दिल्ली – भगवान श्रीरामांचे अयोध्येत मंदिर बांधले जात असताना आणि असंख्य भाविकांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले असताना आता भगवान हनुमानांच्या जन्मस्थळावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानुसार आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनी दावे केले असताना आता आणखी एक स्थळ गोकर्ण येथे हनुमानांचा जन्म झाला असून वाल्मिकी रामायणातही याचा उल्लेख असल्याचा दावा एका महंतांनी केला आहे.
पहिल्या दाव्यानुसार अर्थात आंध्र प्रदेशने केलेल्या दाव्यानुसार तिरूमालाच्या सात पर्वतांपैकी एक असलेल्या अजनेंद्री येथे हनुमानाचा जन्म झाला आहे. तिरूमला तिरूपती देवस्थानमने हा दावा केला असून आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी त्यांनी एक समिती स्थापन केली आहे. त्यात पुराणांचा अभ्यास असणाऱ्या विद्वानांसोबतच भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या एका संशोधकांचाही समावेश आहे. या समितीचा अहवाल 21 एप्रिल रोजी येणार आहे.
मात्र हनुमानाचा जन्म कर्नाटकात झाल्याचा दावा तेथील एका मंत्र्याने केला आहे. कर्नाटकातील हम्पी येथील अजंनेद्री पर्वतासंदर्भात रामायणातही एक संदर्भ देण्यात आला आहे. येथेच राम, लक्ष्मण आणि हनुमान यांची भेट झाली होती. पर्वताच्या शिखरावर हनुमानाचे आणि अंजनादेवीचे मंदिरही असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील रामचंद्रपुरा मठाचे प्रमुख राघवेश्वरा भारती यांच्या म्हणण्यानुसार कर्नाटकच्या गोकर्ण येथे समुद्र किनाऱ्यावर हे स्थान असून वाल्मिकी रामायणातही त्याचा उल्लेख आहे. गोकर्ण हीच भगवान हनुमान यांची जन्मभूमी तर किष्किंधामधील अजनेंद्री त्यांची कर्मभूमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुढच्या वर्षी आपण येथे भगवान हनुमानाची एक विशाल मूर्ती स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.