अन्न, वस्त्र, निवारा या पूर्वीपासून मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र, या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यकता असते ती मुबलक संपत्तीची. माणसाकडे पैसा असला की तो या तिन्ही गरजा सहज पूर्ण करू शकतो. आज या मूलभूत गरजांमध्ये अनेक नवीन संकल्पनाही समाविष्ट होत आहेत. परंतु ही गरजांची यादी कितीही वाढत गेली तरी पैसा हेच याच्या परिपूर्तीचे साधन ठरते. मानवाच्या गरजा कधीही संपत नाहीत. अजून चांगले, याच्यापेक्षा वरचढ असे म्हणत म्हणत गरजा वाढतच जातात. माणसाजवळ चांगला पैसा जरी आला तरी त्याचा हव्यास काही केल्या कमी होत नाही.
सद्यःपरिस्थितीपेक्षा आपल्यापेक्षा अधिक धनवान व्यक्तीशी त्याची स्पर्धा सुरू होते. यातही पैशांनंतर माणूस भुकेला असतो तो प्रतिष्ठेचा. समाजात आपल्याला चांगली प्रतिष्ठा मिळावी. लोकांनी आपला आदर करावा, अशी मानवी वृत्ती तयार होते. मात्र, या प्रतिष्ठेच्या लढाईत त्याला प्रतिस्पर्धी मिळाल्यास मग इर्षा उत्पन्न होऊ लागते. स्वतःचे प्रतिष्ठेचे स्थान अबाधित राखण्यासाठी माणूस वाटेल ते करायला तयार होतो. यातही प्रतिस्पर्धी तोलामोलाचा असेल तर एक नवा पाढा सुरू होतो. हा पाढा म्हणजे श्रेय घेण्यासाठीची चढाओढ. कोणत्याही गोष्टीचे किंवा कामाचे श्रेय हे आपल्यालाच मिळावे हा त्यामागचा दृष्टिकोन असतो. मुळात बालपणापासूनच आपल्याला पाठीवर शाबासकी मिळण्याचा व्यावहारिक धडा पाठ होऊन जातो. यातूनच आपण इतरांपेक्षा वेगळे कसे हे दाखविण्याच्या नादात आपण स्वतःला इतरांपेक्षा वरचढ म्हणून आजमावण्याचा प्रयत्न करतो. यातूनच सुरू होते श्रेयवादाची खरी लढाई. श्रेय घेणे ही माणसाची एक वृत्ती आहे. अमुक-तमुक कामाचं क्रेडिट मलाच मिळायला हवं अशी मानवी धारणा असते.
श्रेयवादात अडकलेल्या माणसाची इच्छा असते, “माझंच कौतुक व्हावं, “मलाच शाबासकी मिळावी, माझाच उदोउदो व्हावा, माझ्याकडेच कुणीतरी लक्ष द्यावं. माणसाला शाबासकी मिळाली, त्याचं कौतुक झालं किंवा त्याची वाहवा केली की त्यातून त्याला आनंद मिळत असतो. या आनंदासाठी माणूस नेहमीच भुकेला असतो. मात्र, हा आनंद मिळाला नाही किंवा हा आनंद आपल्याला मिळण्याची शक्यता नसते तेव्हा माणसाच्या मनाची घालमेल होते. ही घालमेल आणि अस्वस्थता माणसाला श्रेय घेण्यासाठी वाटेल ते करायला भाग पाडते.
राजकारण आणि श्रेयवाद या गोष्टी जणूकाही एकाच शब्दाचे दोन अर्थ. राजकारणात स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी राजकारणी लोक नेहमीच श्रेय घेण्यासाठी आसुसलेले असतात. जनतेच्या करातून केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी त्यांची नेहमीच चढाओढ असते. परंतु राजकारणात सर्रास चालणारे हे श्रेय घेण्याचे प्रयत्न जेव्हा दैनंदिन जीवनात केले जातात तेव्हा नात्यांचे बंध सैल होत जातात.
आपण केलेली एखादी गोष्ट चुकली, फसली किंवा त्यातून काही तोटा झाला तर त्याचे श्रेय आपण इतरांकडे सोपवितो. आपण चुकलोच नाही किंबहुना आपल्यामुळे हे घडलेच नाही अशा अविर्भावात आपण वावरतो. एखाद्या संकटापासून आपला बचाव करणे हा माणसाचा स्वभावगुण आहे. अगदी मानवाच्या निर्मितीपासूनच माणूस हानिकारक ठरणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला नेहमी दूर ठेवत आलेला आहे. मग यात चुका, दोष, अपराध, गुन्हा आणि अपयशास कारण या गोष्टी तर आल्याच. मात्र याउलट जर एखादे काम उत्तमरीत्या पार पडले तर मात्र माणूस यामागे माझे कसे श्रेय आहे हे सांगताना थकत नाही.
थोडक्यात काय तर चांगल्या कामाचे श्रेय स्वतःकडे ठेवायचे मात्र अपयशी ठरणाऱ्या कामात इतरांना भागीदार करायचे हे मानवी स्वभाववैशिष्ट्य आहे. म्हणतात ना यशाचे अनेक बाप असतात; परंतु अपयश हे नेहमी अनाथ असते. एका बाजूला छोट्यामोठ्या कामांचे श्रेय घेणारे मतलबी दिसतात. जे आज ना उद्या अपयशाच्या खोल गर्तेत पुरते अडकून पडतात. तर दुसरीकडे आजही अनेक यशस्वी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्वे मात्र हे श्रेय इतरांनाही देताना दिसतात. कोणतेही काम एकट्याने होत नसते. ते काम तडीस नेण्यात अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हात लागत असतात. म्हणूनच नेतृत्व करणारा किंवा निर्णय घेणारा जरी एक असला तरी त्याला हातभार लावणाऱ्या लोकांशिवाय कार्यसिद्धी पूर्णत्वाकडे जात नाही. महात्मा गांधींनीही स्वातंत्र्यलढ्याचे आणि विविध आंदोलनाचे श्रेय सहभागी देशभक्तांना वेळोवेळी दिले. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा जनसागर उसळून येत असे.
आज अनेक यशस्वी उद्योजक, राजकारणी, कला-क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि विजेते हे आवर्जून इतरांचे आभार मानतात. या आभारातून इतरांचे असणारे अल्प का होईना पण श्रेय वाटतात. त्यामुळेच असे लोक जनमानसात आपली प्रतिमा नेहमी उंचावलेली ठेवतात. लोक अशा लोकांचा आदर, मानसन्मान करतात. म्हणूनच नेहमी हे लक्षात ठेवावे की कोणत्याही कामाचे श्रेय हे एकट्याने लाटण्यापेक्षा सहकाऱ्यांसह वाटायला शिकले पाहिजे. इतरांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता एखाद्या विजयापेक्षाही मोठा आनंद मनाला देत असते. लक्षात ठेवा, एकीचे बळ हे एकट्याच्या बळापेक्षा निश्चितच उजवे असते. म्हणून सर्वांना सोबत घेऊन आणि त्यांना त्यांच्या कामाचे योग्य श्रेय देऊन एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास यावे.
सागर ननावरे