आ. देसाई यांना सत्यजितसिंह पाटणकर यांचा खणखणीत सवाल
पाटण – आ. शंभूराज देसाई तुम्ही यावेळी शिवसेनेतूनच विधानसभा निवडणूक लढवणार हे वाचून आनंद झाला. यात तुम्ही तुमच्या पक्षनिष्ठेचे अनेक दाखले दिले आहेत. तुमचा पक्षावर आणि पक्षाचा तुमच्यावर एवढा प्रचंड विश्वास, निष्ठा होती किंवा आहे. तर मग यापूर्वीच्या निवडणुकीत तुम्ही उमेदवारीसाठी शेवटपर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे उंबरठे झिजवले, तरीही कोणी उभे केले नाही. त्यानंतर अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत पाटणच्या चौकात आल्यावर सेनेचा मफलर अंगावर टाकून स्वत:ची उमेदवारी सेनेतून तर कुटुंबियांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ तुमच्यावर का आली? त्यावेळी तुमची पक्षनिष्ठा कुठे गेली होती, असा सवाल राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी बैठकीत केला.
पाटणकर पुढे म्हणाले, मी या आमदार महोदयांना अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर यांनी पंधरा दिवसांनी दिले. त्यामुळे त्यांनी येणारी निवडणूक शिवसेनेतूनच लढणार हे जाहीर केले असले तरी तो अर्ज दाखल होवून अंतिम प्रक्रियेपर्यंत सेनेतच राहील, याबाबत सेनाच काय पण स्थानिक जनताच नव्हे तर ते स्वतःही गॅरंटी देवू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती त्यांनाही मान्य असेल, पण असू द्या. किमान सध्यातरी त्यांनी सेनेतूनच लढणार हे जाहीर केल्याने लोकांना जरा समाधान वाटले. त्यांच्या खुलाशामुळे माझ्या अनेक प्रश्नांवर त्यांची दातखिळी बसली होती, ती जरा कमी झाली. कारण अशा दातखिळ्या बसलेल्यांच्या तोंडाला कांदा लावून समोरच्याला कधी व कसे शुद्धीवर आणायचे, हे आता मलाच नव्हे तर मतदारसंघातील जनतेलाही चांगलेच समजले आहे.
यापूर्वी जर तुम्ही खरोखरच सेनेशी प्रामाणिक होता. तर मग विधानसभा निवडणुकीत आपल्या कुटुंबियांचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून का दाखल केला होता? जर तुमचा एकमेकांवर एवढा विश्वास व निष्ठा होती. तर तो अर्ज भरताना तुम्हाला निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकच नव्हे तर तारळे जिल्हा परिषद निवडणुकीत ज्यांचा राजकीय बळी दिला ते बंधू का आठवले नाहीत, याचाही खुलासा करा. अर्ज दाखल करण्यापूर्वी तुम्ही कोणकोणत्या पक्षांचे व नेत्यांचे उंबरठे झिजवले हे जगजाहीर आहेच. त्यामुळे तुमच्या निष्ठांचा बाजार माहीत असल्यानेच तुम्हाला कोणी दारात उभे केले नाही.
तुम्ही अर्ज दाखल करायला पाटणला आला. केरा पुलापासून चौकात तुमची मिरवणूक आली तरीही विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? ही तुमची अवस्था होती. चौकात आल्यावर मग कोणताही पक्ष थारा देत नाही, हे समजल्यावर सेनेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने तुम्ही खांद्यावर सेनेचा मफलर घेवून तहसील कार्यालयात जाऊन सेनेतून अर्ज भरला. पुन्हा मागच्या दाराने अपक्ष म्हणून कुटुंबियांचा अर्ज भरला हे कदाचित तुम्ही विसरला असाल पण इतर कोणीही विसरले नाही याचे भान ठेवा. आणि मगच पक्षनिष्ठेचे गोडवे सांगून माझ्यावर व माझ्या पक्षावर टीका करा.
मी विचारलेल्या प्रश्नांवर जर तुमची दातखिळी मोकळी झाली असेल तर मग गेल्या 50 वर्षांपैकी तब्बल 33 वर्षे तुमच्या ताब्यातील साखर कारखान्याची गाळप क्षमता एकही मेट्रिक टनाने का वाढवली नाही, येथे ऊसाला सर्वाधिक रिकव्हरी असतानाही शेतकऱ्यांना कमीत-कमी दर का देता? कारखान्यात कामगारांचे वेतन वेळेत का देत नाही, थकीत देणी का थकवली आहेत. यासह स्वतःच्या वडिलांच्या नावाने काढलेले स्व. शिवाजीराव देसाई मेमोरियल हॉस्पिटलच नव्हे तर त्यातील निदान खाटा तरी आता कुठे आहेत. शिवतेज बझार, शिवशंभू दूध संघ आदी कोणत्या महापूरात नेवून बुडवले? याचाही खुलासा करून तुमची माझ्या प्रश्नांवर बसलेली दातखिळी निघाल्याचे सिद्ध करा, असेही आव्हान त्यांनी केले आहे.