पवनानगर – लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ “महाराष्ट्र बंद’ करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केली आहे. हा तर सरकार पुरस्कृत बंद आज संपूर्ण महाराष्ट्रभर होता. बंद किती यशस्वी झाला. किती प्रकारे दबाव तंत्राचा वापर करुन कुठे रिक्षावाल्याला मारहाण, तर कुठे रिक्षाची चावी काढून घेणे तर चंद्रपूरला दमदाटी करणे अशा संपूर्ण घटना महाराष्ट्रत घडल्या आहेत. मावळ गोळीबार झाला, तेव्हा कुठे होते सरकार, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
मावळ गोळीबारात शहिद झालेल्या तीन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला.
महाराष्ट्रात गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झाले, त्यावेळेस कुठे होते सरकार? तेव्हा का नाही केलात बंद? हा केवळ चौकशांवरुन महाराष्ट्राचे लक्ष विचलित करण्याचा नियोजित कार्यक्रम आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या “महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर केला आहे.
सध्या महाराष्ट्रमध्ये शेतकरी उद्ध्वस्त झाला. महाराष्ट्रावर निसर्ग, तोक्ते वादळाचे संकट आले. या वादळांमुळे पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. काही दिवसांपूर्वी मराठवाडा, विदर्भामध्ये अतिवृष्टी होउन जो शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्या शेतकऱ्यांना पुढील चार ते पाच वर्षे काहीच पिके घेता येणार नाहीत. आतापर्यंत एक दमडीची मदत सरकारने शेतकऱ्यांना केली नाही. आज त्या ठिकाणी पीक विमा असेल तो ही मिळाला नाही, अशी खंत दरेकर यांनी बोलून दाखविली.
आज शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा कापला जातो. घरगुती वीजपुरवठाही खंडित केला जातो. महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करताहेत त्याच्याबद्दल “कॅबिनेट’मध्ये श्रद्धांजली वाहिली नाही. परंतु लखीमपूर घटनेचा महाराष्ट्राच्या “कॅबिनेट’मध्ये श्रद्धांजली वाहिली जाते, याकडेही दरेकर यांनी लक्ष वेधले. लखीमपुरची घटना वाईटच आहे. आम्ही त्याचा निषेधच करतो. गृहराज्यमंत्र्याच्या मुलाल अटक ही करण्यात आली आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मतही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, पवना बंद जलवाहिनी कृती समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, माजी संचालक पांडुरंग ठाकर, बाळासाहेब घोटकुले उपस्थित होते.