मुंबई – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर शरसंधान केले आहे. जिथे सत्ता तेथे विखे-पाटील यांचे कुटुंब जाते. ते सत्तेशिवाय राहूच शकत नाही, असा थेट आरोप मलिक यांनी केला आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आमदारपदाच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारले असता नवाब मलिक म्हणाले, 1995 मध्ये शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी विखे-पाटील यांच्या वडीलांना मंत्रीपद मिळाले होते. नंतर युपीएचे सरकार आल्यानंतर आणि आता भाजपची सत्ता आल्यावर राधाकृष्ण विखे-पाटील भाजपकडे वळले आहेत.
विखे-पाटील यांचा मुलगा ज्यावेळी भाजपमध्ये गेला, त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यासारखे होते. पब्लिसिटीसाठी टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करत आहेत. विरोधी पक्षनेता गेला हे सांगण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.