ना. जयंत पाटील; इतिहास पुसण्याचा डाव महाराष्ट्र सहन करणार नाही
सातारा – दिल्ली येथील विधानसभा निवडणुकीत तानाजी मालुसरे यांची तुलना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर करुन भाजप इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत आहे. कुठे तानाजी मालुसरे आणि कुठे अमित शहा? अशा शब्दांत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना कधीही होऊच शकत नाही, महाराष्ट्रातील जनता हे कदापी सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
येथील सैनिक स्कूलमधील वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमानंतर ना. पाटील पत्रकारांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षाने इतिहास पुसण्याचे षडयंत्र चालवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी आधी नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली.
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात याबाबत राग असतानाच आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत तानाजी मालसुरे यांच्याशी अमित शहा यांची तुलना भाजप करु पाहत आहे. छत्रपतींची इच्छा पूर्ण करुन तानाजी मालुसरे यांनी किल्ला सर केला आणि आपला देह ठेवला. असे शूरवीर तानाजी मालुसरे कुठे आणि अमित शहा कुठे, अशी टीका पाटील यांनी यावेळी केली आहे.
साताऱ्यातील मेडिकल कॉलेजचे काम भाजपच्या राजवटीत सुरु होणे अपेक्षित होते; मात्र, त्यांनी हा विषय प्रलंबित ठेवला. मेडिकल कॉलेजला जलसंपदा विभागाची जागा देण्यात येणार असून महिनाभरात याबाबत निर्णय होणार आहे. जिहे- कठापूर योजनेचे पाणी दोन महिन्यांच्या आत दुष्काळी भागात पोहोचणार आहे. जिल्ह्यातील सिंचनाच्या प्रलंबित प्रश्नांना चालना देऊन दुष्काळी भागाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे. सातारच्या हद्दवाढीचा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील अभ्यास करुन तशी सूचना शासनास करतील, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.