मुंबई: राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब सत्तेशिवाय राहू शकत नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
१९९५ साली शिवसेनेच्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांना मंत्रीपद मिळाले होते, नंतर युपीएचं सरकार आलं त्यावेळी पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसकडे आणि आता भाजपची सत्ता आल्यावर राधाकृष्ण विखे पाटील भाजपकडे वळले आहेत, अशी टीका मलिक यांनी केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा ज्यावेळी भाजपमध्ये गेला त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यासारखे होते. चर्चेत राहण्यासाठी फक्त टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करत आहेत. विरोधी पक्षनेता गेला हे सांगण्यासाठी आज त्यांनी राजीनामा दिला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण आज राजीनामा दिला आहे. पक्षाने माझी कोंडी केली आहे. काँग्रेसमध्ये माझी घुसमट होत असल्याचे विखे पाटील म्हणाले. राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील थेट गिरीश महाजनांच्या भेटीसाठी मंत्रालयात गेले, महाजनांच्या भेटीपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाल्याची माहिती मिळत आहे.