पाच दिवसांत दोनदा ढगफुटीसदृश पावसाचा अनुभव
– रोहन मुजूमदार
पुणे – सध्या परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. विशेषत: याची तीव्रता पुरंदर, हवेली, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यात सर्वाधिक आहे. पुरंदर, हवेली तालुक्याला बुधवार (दि.14) पाठोपाठ रविवारी (दि. 18) ढगफुटी सदृश पावसाने तडाखा दिला. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. आता केवळ शेतात पाणी, चिखल, गाळ अन् दगड धोंड्यांशिवाय काहीच राहिले नसल्याने शेतकऱ्यांवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली आहे.
जनावरांवर उपासमारीची वेळ
जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाची परिस्थिती ओढावली असून आता फक्त कागदोपत्री ते जाहीर होण्याचा अवकाश आहे. या अतिपावसामुळे जनावरांचा चारा काही ठिकाणी वाहून गेला आहे तर अनेक ठिकाणी भिजला आहे. तर लावलेला चारा पीकही वाहून गेल्याने आता जनावरांना खाण्यासाठी काय द्यायचे, असा प्रश्न बळीराजापुढे “आ’वासून उभा राहिल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ आणली आहे.
1130 हेक्टरवर केवळ पाणीच पाणी
वाघापूर, आंबळे, राजेवाडी परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या ढफुटीमुळे पाण्याचे लोटच्या लोट पांडेश्वर परिसरात आले. त्यामुळे या गावांसह पांडेश्वरचा शेतकरी अक्षरश: झोपला आहे. या परिसरात सर्वाधिक कांदा पीक घेतले जाते. यंदा अतिपावसामुळे आधीच रोपे व कांदा बियाणांची कमतरता होती तरी जादा पैसे देऊन शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, आता हे पीक वाहून गेले आहे. एकट्या पांडेश्वर परिसरात सुमारे 1130 हेक्टरवर केवळ पाणी, चिखल अन् गाळच शिल्लक राहिला आहे.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतीचे बांधबंदिस्ती सगळेच वाहून गेल्याने सुमारे दोन महिने आता शेतात काहीच करता येणार नाही. दुबार पेरणीसाठीही पैसा शिल्लक राहिलेला नाही तर कर्ज फेडणे दूरच. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा पेरणी करेल की नाही याची शाश्वती नाही.
– संजय जगताप, शेतकरी तथा माजी सरपंच, पांडेश्वर (ता. पुरंदर)
काऱ्हाटी परिसराला शनिवार (दि. 10) पासून बुधवार (दि. 14) पर्यंत सलग चार दिवस व रविवारी (दि. 17) मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, भाजीपाला, कांदा रोप, लागवड केलाला नवीन कांदा, बांधबंदिस्त असे सुमारे 50 हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर रस्ते, ओढे-नाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे नुकसान न भरून निघणारे आहे.
– अशोक लोणकर, शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य, काऱ्हाटी (ता. बारामती)