मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल (दि. १) मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. बॉलिवूड उत्तर प्रदेशात नेण्यासाठी पहिली बैठक पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र योगींच्या या दौऱ्यावरून महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.
दरम्यान, आता महाविकास आघाडी सरकार पाठोपाठ मनसेकडून सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. योगी वास्तव्यास असलेल्या हॉटेलनजीक मनसेकडून बॅनरबाजी करत अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’ असं म्हणत योगी आदित्यनाथ यांचं नाव न घेता त्यांनी जोरदार टोला लगावला.
“कहा राजा भोज…और कहा गंगू तेली….”कुठे महाराष्ट्राचं वैभव”….तर कुठे युपीचं दारिद्र्य…असे मनसेने या बॅनरमध्ये म्हटलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, असं या बॅनवर लिहिण्यात आलं आहे.