लंडन – पीएनबी बॅंकेला 13 हजार 500 कोटींचा चुना लावून पसार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी सध्या सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यातच सध्या भारतातून पसार झालेल्या नीरव मोदी, विजय मल्ल्या यांचीही चर्चा सुरु आहे.
यादरम्यान पीएमएलए कोर्टाने कर्ज वसूल करण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि इतर बॅंकांना विजय मल्ल्याची संपत्ती विकण्यास परवानगी दिली आहे. ही संपत्ती ईडीने जप्त केली असून 1 जून रोजी हा निकाल दिला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान होणाऱ्या चर्चेवर विजय मल्ल्याने नाराजी जाहीर केली आहे.
आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याने प्रसारमाध्यमांमध्ये फसवणूक करणारा असा उल्लेख होत असल्याने नाराजी जाहीर केली आहे. विजय मल्ल्याने ट्वीट करत म्हटले आहे की, मी टीव्ही पाहत असून वारंवार माझा उल्लेख फसवणूक करणारा असा केला जात आहे. किंगफिशर एअरलाइनवर असलेल्या कर्जापेक्षा जास्त मालमत्ता ईडीने जोडली आहे. तसेच अनेक वेळा मी 100 टक्के रक्कम परत करण्यासाठी ऑफर दिली आहे. याचा कोणीच विचार करत नाही का? कुठे आहे फसवणूक?.
दरम्यान, भारतातील विविध 17 बॅंकांचे 9000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविणारा विजय मल्ल्या भारतातून फरार आहे. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताकडून प्रयत्न सुरु आहेत.