शिक्रापूर -विविध राजकीय घडामोडींमुळे शिरूर तालुका नेहमीच चर्चेत असतो. मात्र तालुक्यातील करोना कमी झाल्यामुळे गावनेते, पुढाऱ्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. त्यामुळे आमचे नेते गेले तरी कुठे? अशा चर्चा तालुक्यातील नागरिकांमध्ये रंगू लागल्या आहेत.
करोना काळात ग्रामपंचायत निवडणुका होत्या. त्यावेळी गावनेते, लोकप्रतिनिधी गावागावांत तळ ठेकून होते. परंतु जसा करोना कमी कमी होत गेला तसे गावनेते व पुढारी दुर्मिळ होत गेले.
त्यामुळे शिरूर तालुक्यातील नागरिकांना लोकप्रतिनिधी, गावनेत्यांची आस लागल्याचे दिसून येत आहे. शिरूर तालुक्यातील लोकसभा, विधानसभा या निवडणुकींना विशेष महत्व प्राप्त
झालेले होते. लोकसभा निवडणुकीत अनेक वर्षे आपला हक्क ठवेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात अचानक डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव चर्चेत आले.
यावेळी राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी प्रचाराची धुरा सांभाळली अन शिवसेनेच्या हातातील लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे गेली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान अभिनेते असलेले अमोल कोल्हे नागरिकांना वेळ देतील का?
असा प्रचार केला जात असताना निवडणुकीनंतर करोनाची लाट आली अन् अखेर खासदार अमोल कोल्हे यांचे नागरिकांना दर्शन दुर्मिळ होत गेले. त्याचाच फायदा आढळराव पाटील यांनी घेत मतदारसंघात लक्ष केंद्रित केले.
यामुळे अनेक ठिकाणी माजी खासदार हेच खरे खासदार असल्याचे बोलले जाऊ लागले, तर एकीकडे विधानसभा निवडणुकी दरम्यान बाबुराव पाचर्णे व अशोक पवार यांच्यामध्ये लढत होऊन अखेर सत्ता पालट होत भाजपाच्या हातातील विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडे गेली.
त्यानंतर बाबुराव पाचर्णे यांचे मतदार संघात दुर्लक्ष होत गेले, मात्र सामाजिक संघटनेतून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले संजय पाचंगे यांनी मतदार संघात लक्ष केंद्रित केल्याने पुढील विधानसभा वेळी संजय पाचंगे हे उमेदवार असल्याचे बोलले जाऊ लागले.
सर्व घडामोडी घडत असताना ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान अनेकांनी आपलाल्या भागात लक्ष केंद्रित करून ग्रामपंचायत सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केले,
मात्र अलीकडील काळात सर्वजण करोनामुळे शांत झालेले असून राजकीय नेत्यांपैकी मंगलदास बांदल हे काही कारणामुळे पोलीस कोठडीत आहेत, मात्र इतर सर्व नेते गायब झालेले असल्याने शिरूर तालुक्यातील आमचे नेते गेले कुठे? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.