पाणी संघर्षाचे दुसरे मिशन सुरू करणार
सातारा: नीरा- देवघरचे हक्काचे पाणी बारामतीला देणारे भगीरथ मागील 15 दिवसांपासून कुठे आहेत, असा सवाल आमदार जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला. “भगीरथ दाखवा अन 101 रूपयांचे बक्षीस गोरे यांनी जाहीर केले. नीरा- देवघरच्या निमित्ताने पाण्याचे पहिले मिशन पूर्ण झाले. आता सातारा जिल्ह्याची तहान भागल्याशिवाय आणि टेंभू योजनेतून खटाव तालुक्याला तीन टीएमसी पाणी मिळाल्याशिवाय धरणांमधील पाण्याचा एक थेंबही जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही, असे गोरे यांनी सांगितले.
उदयनराजेंपाठोपाठ गोरे यांनीदेखील पत्रकार परिषद आयोजित करून रामराजेंवर टीका केली. गोरे म्हणाले, “”नीरा-देवघरचे हक्काचे पाणी मागील 12 वर्षापासून खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील गावांना मिळत नव्हते. यापैकी फलटण आणि खंडाळा तालुक्यातील लाभक्षेत्राला पाणी मिळावे, यासाठी रामराजेंनी 20 वर्षे मंत्रिपदाच्या कार्यकाळात प्रयत्न केले नाहीत. वास्तविक दोन्ही तालुक्यांनी राजे घराण्यावर कायम प्रेम केले. मात्र, त्यापैकी रामराजेंच्या मिंत्रपदाच्या काळात व स्वाक्षरीने मतदारसंघातील आई- बहिणींचे पाणी बारामतीला देण्याचा निर्णय झाला.” कालवे तयार होऊच नयेत म्हणून त्यांनी आपल्या मातीशी बेईमानी केली. आपल्या मातीला उपाशी ठेवून त्यांनी पद व राजकीय उंची टिकवून ठेवली, अशी टीका गोरे यांनी केली.
नीरा- देवघरच्या पाण्याचा मुद्दा माढ्याच्या निवडणूकीच्या प्रचारात होता. तो आता पूर्ण केलो. मात्र, आता यापुढे पाणी संघर्षाचे दुसरे मिशन हाती घेतले आहे. जिल्ह्यात दोनशे टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा होऊनदेखील सध्या जिल्ह्यात सर्वत्रच टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी जिल्ह्याची तहान भागल्याशिवाय धरणांमधील पाण्याचा थेंबही जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही. त्यासाठी कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची तयारी आपण केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. इतर जिल्ह्यांना पाणी द्यायला विरोध नाही परंतु आमची तहान भागवल्यानंतरच पाणी देण्याचे धोरण यापुढे राबविले गेले पाहिजे.
कोयनेतून ताकारी- म्हैसाळ योजनेला 26 टीएमसी पाणी दिले जाते. मात्र, त्यापैकी एक थेंबही सातारा जिल्ह्याला मिळत नाही. कोयनेतून टेंभू योजनेसाठी 18.46 व वांग धरणातून 1.03 टीएमसी पाण्यासह पावसाळ्यातील पुराचे 0.97 टीएमसी दिले जाते. या योजनेत जिल्ह्यातील कराड तालुक्यातील फक्त तीन गावे समाविष्ट आहेत. त्यांना केवळ 0.17 टक्के पाणी दिले जाते. दुसऱ्या बाजूला टेंभू योजनेतून सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहाकाळ आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील 237 गावांना कोयना आणि वांग धरणातून वीसपेक्षा अधिक टीएमसी पाणी दिले जाते. टेंभू धरणाचा दोन किलोमीटरचा 36 फुंट उंच कालवा खटाव तालुक्यातून गेला आहे. त्या कालाव्यातून एकही थेंब खटाव तालुक्याला मिळत नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. पाणीवाटपाचे निर्णय होताना जिल्ह्यातील नेते काय करत होत, असा प्रश्न करून यापुढे “धरणे सातारा जिल्ह्यात आणि पाणी दुसऱ्या जिल्ह्याला’ हे धोरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला.