नवी दिल्ली – केंद्र सरकारने जुलै महिन्यात आत्तापर्यंत तब्बल दहा वेळा इंधनाच्या दरात वाढ केली आहे. या वाढीतून केंद्र सरकारला प्रचंड प्रमाणात पैसा मिळतो आहे पण हा पैसा नेमका जातो कोठे असा सवाल कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी विचारला आहे. या संबंधात संसदेत सरकारने श्वेत पत्रिका सादर करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून केंद्र सरकारने जी इंधन दरवाढ केली आहे त्यातून गेल्या सात वर्षात मोदी सरकारला तब्बल 25 लाख कोटी रूपयांचा अतिरीक्त लाभ झाला आहे अशी माहिती कॉंग्रेसचे राज्यसभेतील नेते मल्लिकार्जून खरगे यांनी अलिकडेच दिली होती.
राजधानी दिल्ली मध्ये मे महिन्यापासून आत्तापर्यंत तब्बल 41 वेळा इंधन दरवाढ केली आहे. केवळ मे महिन्यापासून करण्यात आलेल्या या 41 वाढी मुळे पेट्रोलच्या दरात 10 रूपये 79 पैसे तर डिझेलच्या दरात 8 रूपये 99 पैसे इतकी वाढ झाली आहे.