ग्रामस्थांचा संतप्त सवाल : नागरिकांच्या मरणयातना
सोरतापवाडी- कोरेगाव मूळ फाटा ते काकडे मळा फाटा या पाच किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पाच किलोमीटरमध्ये थेऊर, नायगाव, पेठ गावांचा भाग येत आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने दुचाकीस्वार व वाहनचालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. प्रसंगी अपघात होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी एक मोठी कंपनी आहे. दोन वर्षांपूर्वी या मार्गावरून कंपनीचे मोठे ट्रक जात होते. नागरिकांनी उपोषण व आंदोलन करून जड वाहतूक बंद करून कंपनीने पाच कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते.
हलक्या वाहनांने वाहतूक करण्याचे मान्य केले होते. परंतु त्यावेळी रस्त्यावर फक्त डांबराचा थर टाकून येथील गावकऱ्यांच्या समस्येवर मीठ चोळल्याचे दिसत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा रस्ता उरुळी काचंनला जाण्यासाठी जवळचा असाहे. सोलापूर महामार्गावर जाण्यासाठी उपयोग होतो. हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरवस्थेत आहे. पाच किलोमीटर रस्त्याचे काम अद्यापही अपुरे असल्याने ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी खासदार व आमदार यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.