इड्डुक्की (केरळा) – गेलेल्या माणसांच्या नावानं चांगलं बोलणारी माणसंही दुर्मिळ होत आहेत. त्याचवेळी भूस्खलनात मातीच्या ढिगाऱ्याखअली सापडलेल्या मालकाचा शोध घेण्यासाठी दोन कुत्री गेले चार दिवस काहीही न खाता पिता ठाण मांडून आहेत. मुक्या जीवांची ही तगमग मदत करणाऱ्या जवानांच्या डोळ्यातही पाणी आणत आहे… त्यांच्याही नकळत.
मुन्नरजवळच्या पेट्टीमलाई पर्वत रांगांचा भाग असणाऱ्या राजमलाईमध्ये भूस्खलन झाले. यात किमान 49 जण मरण पावले. गरीबांच्या 30 झोपड्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. त्यात या दोन श्वानांचे मालकही असावेत.
मदत कार्य करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी या श्वानांना काही घास खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. मत्र, त्याच्याकडे तोंड फिरवले. ही कुत्री आजूबाजूला घुटमळत असतात. अख्खी माती हूंगत असतात. बाजूला असलेल्या शेडच्या असऱ्याला उभी राहतात. त्यांच्या डोळ्यातून गळणारी आसवं थांबलेली आम्ही पाहिलीच नाहीत. त्यातून त्यांची आधिरता स्पष्ट होतेय, मुन्नरचे पत्रकार एम. जे. बाबू सांगत होते.
जेव्हा एखादा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढला जातो त्यावेळी ही दोन्ही कुत्री पळत येतात आणि निराश होऊन परत जागेवर जाऊन बसतात. प्रत्येक मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते पहायला येतात, हा आपला मालक तर नाही…, आपला हुंदका आवरत बाबू कसेबसे सांगतात. त्यानंतर त्यांनाही आपली आसवे रोखणे अशक्य होते.
काही स्थामिकांनी या कुत्र्यांना आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती जागेवरून हललीच नाही. या नैसर्गिक आपत्तीत ती कशी वाचली हे कोडेच आहे. पण… त्या दिवशी पाळीव जनावरे जोरजोरात आवाज काढत होते, असे स्थानिक सांगतात.
पोलिसांच्या श्वानांची कामगिरी…
दरम्यान, पोलिसांच्या माया या प्रशिक्षित श्वानाने स्थानिकांची मने जिंकली. त्याने ढिगाऱ्याखालील सहा मृतदेह शोधले आहेत. माया आणि डोना हे श्वान रविवारपासून सेवेत आहेत. माया मृतदेह वासावरून शोधते. तर डोना जीवंत माणसांना शोधण्यासाठी प्रशिक्षित आहे.