अनधिकृत, फुकट्या जाहिरातदारांमुळे झाडांना वेदना
कारवाईची केवळ घोषणाच; जाहिरातींसाठी ठोकले जाताहेत खिळे
पिंपरी – कोणत्याही प्रकारच्या जीवनासाठी वृक्ष आणि वनस्पती यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे अत्यावश्यक आहे. मनुष्यास प्राणवायू देणाऱ्या या वृक्षांमध्ये मनुष्य मात्र खिळे ठोकत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत जाहिरातीचे बॅनर लावण्यासाठी झाडांचा सर्रास वापर केला जातो. झाडांमध्ये खिळे ठोकून जाहिरातींचे फलक लावले जातात. पर्यावरणासाठी झाडे खिळेमुक्त आणि आळेयुक्त होणे गरजेचे आहे. परंतु हे कधी होणार, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची ओळखच पिंपळ, चिंच व वड अशा झाडांमुळे आहे. मात्र, काही वर्षांपासून विकासाच्या नावाखाली शहरातील झाडे नष्ट होत आहेत. तर, आहेत त्या झाडांची पुरेशी काळजी घेतली जात नाही. यामुळे शहरातील महत्वाची झाडे दिवसेंदिवस नष्ट होत आहेत. शहरात दरवर्षी महापालिका प्रशासनाच्या उद्यान विभागाकडून वृक्षलागवड केली जाते. त्यांची देखभाल मात्र शून्यच असल्याचे दिसून येत आहे. शहरातील विविध भागात राजकीय, व्यावसायिक व अन्य कारणासाठी झांडाना खिळे ठोकून जाहिराती लावल्या जात आहे.
कोंडतोय वृक्षांचा श्वास
शहरातील रस्त्यालगत तयार करण्यात आलेल्या पदपथावर झाडे लावण्यात आली आहेत. मात्र, त्या झाडाभोवती योग्य ते आळ्यासाठी जागा न सोडल्याने आणि सिमेंट कॉंक्रिटने केवळ बुंध्याइतकीच जागा सोडली आहे. यामुळे झाडांचा श्वास कोंडला जात आहे. याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना उद्यान विभागाकडून केली जात नाही. उलट गुळगुळीत उत्तरे दिली जातात. महापालिककडून झाडे लहान असताना त्यांच्या सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्या बसविल्या जातात. परंतु ती झाडे मोठी झाल्यानंतर त्या जाळ्या काढल्या नाहीत. आता अनेक ठिकाणी या जाळ्यात झाडांमध्ये घुसल्याचे दिसून येत आहे.
जबाबदारी फक्त सामाजिक संस्थांचीच?
पर्यावरण प्रेमी माधव पाटील यांच्या अंघोळीची गोळी या संस्थेच्यावतीने खिळेमुक्त झाडे अभियान राबविण्यात येते. दरवर्षी शहरातील शक्य होतील तितके झाडाला ठोकलेली खिळे काढले जातात. मात्र, उद्यान विभागाकडून याबाबत कुठलेही काम केले जात नाही. याबाबत वारंवार उद्यान विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्यापही यावर कारवाई करण्यात आली नाही. याबाबत उद्यान विभागास कधी जाग येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आमच्या व इतर संस्थांच्या मदतीने आम्ही शहरातील अनेक झाडे खिळेमुक्त केली होती. परंतु आता परत त्या झाडांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. झाडांना खिळे ठोकून जाहिरात लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची महापालिकेने घोषणा केली होती. परंतु कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. झाडांना वाचविण्यासाठी गांभिर्याना याबाबत विचार होणे आवश्यक आहे.
– माधव पाटील, संस्थापक, अंघोळीची गोळी