प्रशासनाच्या गैरव्यवहारामुळे रविवारी पुन्हा गैरसोय : बाजार घटकांचा आरोप
पुणे – मार्केट यार्डात रविवारी पुन्हा मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. नेहमीच्या तुलनेत आवक साधारण असतानाही प्रशासनाच्या गैरव्यवहारामुळे हे होत असल्याचा आरोप बाजार घटकांकरून करण्यात येत आहे.
हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान येथून विविध फळांसह फळभाज्यांची आवक होते. ही आवक होत असल्याने संबंधित व्यापाऱ्याच्या गाळ्यावर माल उतरवून संबंधित वाहन चालक दुसऱ्या बाजूने बाजार आवाराच्या बाहेर पडतात. मुख्य प्रवेशद्वारातून शेतमाल भरलेली वाहने बाजार आवारात येतात. गाळ्यावर माल रिकामा केल्यानंतर गेट क्रमांक चारच्या बाजूने ते बाहेर पडतात. तर मार्केट यार्डातील घाऊक भुसार विभाग रविवारी बाजार बंद असतो. त्यामुळे त्या बाजूला असलेल्या गेट क्रमांक चारलगत वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र रविवारी दिसले.
वाहनांसाठी पार्किंगची स्वतंत्र जागात असताना अनेक वाहने इतरत्र पार्किंग करण्यात आली. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या अथवा जाणाऱ्या वाहनांना बाहेर जाणे अथवा बाजार आवारात येणे अशक्य झाले होते. बाजार आवारात शेतमालाची आवक वाढल्यानंतर अनेकदा वाहतूक कोंडी होते. मात्र, रविवारी मोठ्या प्रमाणात आवक नसताना कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच चुकीच्या व्यवस्थापनामुळे वाहतूक कोंडी झाली.
अनेक ठिकाणी ट्रक, टेम्पोंचे पार्किंग हे रस्त्यावर केल्याने देखील वाहतूक कोंडी झाली. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे रविवारी लक्ष नसल्याचे दिसून आले. वाहतुकीचे नियमन करण्यापेक्षा पार्किंग शुल्क करणे, वाहनांना जॅमर लावणे तर कोणी गप्पा मारण्यात गुंग असल्याचे दिसून आले. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बाजारात येणारा ग्राहक तसेच खरेदीदार यांना मनःस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.