– दत्तात्रय गायकवाड
हवेली तालुक्यांमधील पीएमआरडीए जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू आहेत. पुणे शहरालगत भाग म्हणून हा तालुका ओळखला जातो. तालुक्यांमध्ये अनेक विकासकामांना मोठ्या प्रमाणात गती आली आहे. मात्र, रस्त्यांच्या कामाबाबत सध्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
रस्त्यांच्याकडेला पडणारा राडारोडा तसेच अर्धवट कामे यामुळे नागरिकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. विकासकामे करताना जास्तीचे मनुष्यबळ वापरले जात नसल्याने कामे संथगतीने सुरू आहेत. या कामांमध्ये नागरिकांकडून आता निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याची तक्रार देखील केली जात आहे.
काही ठिकाणी तालुक्यांमध्ये रस्त्यांच्या कामामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, विभागप्रमुखांना रस्त्याच्या कामांमधून नागरिकांना अडथळे येणार नाहीत अथवा कोणत्या प्रकारचे अपघात होणार नाहीत, याबाबत खबरदारी घेण्याच्या व त्यादृष्टीने योग्य त्या पावले उचलण्याबाबत सूचना करणे गरजेचे होते. मात्र, अधिकाऱ्यांकडून तसेच संबंधित रस्त्याच्या गुणवत्तेची पाहणी करणाऱ्या निरीक्षकांकडून योग्य ती खबरदारी न घेतल्याने सध्या रस्त्यांवर राडारोडा व वाहतुकीबरोबर नागरिकांच्या प्रवासातील अडथळा बनला आहे.
काम झालेल्या ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी काम सुरू असताना पावसाच्या पाण्यामुळे सुरू असलेल्या कामातील खड्डयांची संख्या वाढली आहे. याबाबतीत संबंधित विभागाने योग्य ती पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.