- वारंवार तक्रारी करून नागरिकही वैतागले
- तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता; रुग्णांची उपचारासाठी अन्य मोठ्या शहरांकडे धाव
कर्जत – कर्जत शहराच्या मध्यभागी 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय असूनही येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेअभावी तालुक्यातील रुग्णांना पनवेल, नवी मुंबई, मुंबई गाठावी लागत आहे. एम. डी. मेडिसिन, भूलतज्ज्ञ आदींची डॉक्टरांची कमतरता आहे. याबाबत यापूर्वीही अनेकदा या रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारावर बोट ठेवत तो सुधारण्यासाठी सामाजिक, राजकीय नेतेमंडळींनी उपोषणे, आंदोलने झाली. पण सारे व्यर्थ त्यामुळे आता या कारभाराबाबत तक्रारी तरी किती वेळा करायच्या अशी हतबलता नागरिकांतून व्यक्त होत आहेत. या रुग्णालयाचा कारभार सुधारणार तरी कधी ? असा उपहासात्मक सवाल नागरिक करीत आहेत.
आता सद्यस्थितीत जे दोन डॉक्टर कार्यरत आहेत, ते पाच ते सहा वर्षांपासून याच रुग्णालयात काम करतात. त्यातील एक डॉक्टर कायम स्वतःच आजारी असल्याचे सांगत पूर्ण क्षमतेने काम करायचे टाळतात, तर दुसऱ्या डॉक्टरांच्या पत्नीचा याच शहरात खासगी दवाखाना असल्याने त्यांचा अधिक वेळ तेथे घालवतात किंवा उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णाला आपल्या खासगी रुग्णालयात जाण्यास भाग पाडतात. तथा सल्ला देतात. या अशा कारभारामुळे रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळत नाही.
काही महिन्यांपूर्वी रुजू झालेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी पदभार स्वीकारताच काही सुधारणा केल्या; परंतु हाताखालील सहकारी डॉक्टरांचे अपेक्षित सहकार्य त्यांना मिळत नसल्याने त्यांनाही मर्यादा येत आहेत.
या रुग्णालयात सध्या करोना “पॉझिटिव्ह’ रुग्णांसाठी कक्ष उभारविण्यात आला आहे. सुमारे 50 खाटांचे “ऑक्सिजन बेड’ची सुविधा डॉ. बनसोडे यांनी करून घेतली आहे. रुग्णांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या रुग्णांसाठी काही दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर सुद्धा आणलेत. परंतु ते “ऑपरेट’ करण्यासाठी एमडी (मेडिसिन), भूलतज्ज्ञ आदींची डॉक्टरांची कमतरता आहे.त्यामुळे या सुविधांचा लाभ रुग्णांना देण्यात अडचणी येत आहेत.
तरी आरोग्य विभागाने याची दखल घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी आणि कामचुकार डॉक्टरांवर कारवाई करावी अथवा येथून बदली करावी, अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.
आमदार थोरवे लक्ष घालणार
जिल्हा रुग्णालयावर जी स्थानिक लोकप्रतिनिधींची कमिटी आहे; ती फक्त कागदावरच. प्रत्यक्षात रुग्णालयाच्या कारभारावर कोणाचे लक्ष नाही, की अंकुशही नाही. त्यामुळे ही प्रवृत्ती बळावत आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांनी यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून रुग्णालयातील त्रुटी दूर करून सर्व सामान्य गोरगरिबांना उपचार कसे मिळतील यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. तसेच स्थानिक नवीन कमिटी नेमावी, असेही नागरिकांमधून सुचविण्यात आले आहे.
करोनाचे कोणतेही लक्षण दिसून आल्यास तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात येऊन “टेस्ट’ करावी. जेणे करून त्वरित उपचार होऊन पुढील संभाव्य धोका टाळता येईल. सद्या 50 ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात आली आहे. अधिक चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– डॉ. मनोज बनसोडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कर्जत