अनिल देशपांडे
राहुरी – राहुरी बसस्थानक व रेल्वेस्थानक यांच्या विकासाशी पालिकेचा थेट संबंध नसला तरीही या दोन्ही यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित असत्या तर राहुरीच्या विकासाला अधिक गती मिळाली असती. राहुरी हा एकमेव तालुका आहे, की जिथे एसटीचे आगार नाही. सन 2010 मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरीसाठी अद्ययावत एसटी स्थानक व बस डेपो करण्याची घोषणा केली, मात्र निविदा निघण्यापूर्वीच त्यांचे मंत्रिपद गेले आणि प्रश्न जागच्या जागीच राहिला. त्यानंतर मंत्री पदाची संधी मिळालेल्या प्राजक्त तनपुरे यांनीही त्याचा पाठपुरावा केला. पाच कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार झाला. मात्र निविदा प्रक्रिया अजूनही शासकीय भाषेत सुरू आहे. परिणामी नजीकच्या शिर्डी, कोल्हार, बाभळेश्वर, संगमनेर अशा बसस्थानकांचा विकास झाला असला तरी राहुरीतील बसस्थानक मात्र शेवटच्या घटका मोजत आहे.
बसस्थानकाचे आधुनिकीकरण करून हा प्रश्न सुटणारा नाही तर तालुका अंतर्गत दळणवळणाची व्यवस्था सक्षम होण्यासाठी किमान 20 एसटी गाड्या राहुरी आगारासाठी मंजूर होणे आवश्यक आहे. वीस बसेस व त्या अनुषंगाने चालक, वाहकाची पदे मंजूर झाली तर तालुकांर्तगत दळणवळण व्यवस्था सक्षम होईल. राहुरी ताहाराबाद- साकूर व संगमनेर- पुणे महामार्ग हा मुंबईकरीता जवळचा रस्ता विकसित होवू शकतो. साकूरपासून पुढे दुपदरी रस्ता आहे. राहुरी ताहाराबाद ते साकूर हा रस्ता विकसित होणे आवश्यक आहे.
रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधांची उपलब्धी आहे. प्लॅटफॉर्म, प्रतीक्षालय, उपहारगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था अशा सर्व सुविधा झाल्या असल्या तरी जोपर्यंत चार किंवा पाच पॅसेंजर व एक्सप्रेस रेल्वे यांना तिथे थांबा मिळत नाही, तोपर्यंत दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वेचा उपयोग होवू शकत नाही. केद्रांत लोकप्रतिनिधीत्व केलेल्या व करीत असलेल्या सर्वांना याबाबत सातत्याने साकडे घातले गेले. श्रीरामपूर बाजारपेठेच्या विकासात रेल्वे स्थानकाचे महत्त्व निर्विवाद आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे ही पाठपुरावा केला गेला. राहुरी मतदारसंघाने विखे कुटुंबातील सदस्यांना भरभरून प्रेम देत आले आहेत. याचा उल्लेख त्यांच्या कुटुंबातील सर्वांनीच सातत्याने केला आहे. ते ऋणानुबंध लक्षात घेवून अनेक वर्षांची पाच एक्सप्रेसना शनीशिंगणापूरसाठी थांबा मंजूर करतील, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना आहे.
बाह्य वळण रस्ता नगर- मनमाड या राष्ट्रीय महामार्गामुळे गावातील अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. अनेकांनी अपघातात प्राण गमावले आहेत. या महामार्गावरील वाहतूकीचा गावावर प्रचंड ताण आहे. याला पर्याय म्हणून विकास आराखडात बाह्यवळण रस्ता प्रस्तावित आहे. मात्र पालिकेच्या पातळीवरती या बाह्यवळण रस्त्याचा विकास होण्याची शक्यता दुरापास्त आहे. पालिकेच्या उत्पन्नातून हा रस्ता विकसित होण्यास वर्षानुवर्ष लागू शकतात. संगमनेर, शिर्डी, राहाता येथील व नगर येथील बाह्य वळण रस्त्याचे प्रस्ताव केव्हाच मंजूर होऊन त्याची अंमलबजावणी देखील झाली आहे. याही बाबतीत राहुरी पिछाडीवर आहे.
राहुरीच्या बाह्यवळण रस्त्याचा प्रस्ताव केवळ कागदावरतीच अडकला आहे. राहुरी शहरातील बाह्यवळण रस्ता विकसित झाल्यास राहुरीच्या विकासाला वेग मिळू शकतो. त्या आधी सन 2009 च्या आसपास नगर- मनमाड राज्यमार्गाच्या चौपदरीकरणात राहुरीत उड्डाणपूल असल्याचे सांगितले गेले. तो झाला असता तर नाशिकरोडच्या उड्डाणपूल धर्तीवर उड्डाणपूलाखाली फेरीवाले, हातगाडीवाले बसविता आले असते. पण उड्डाणपूल झाला नाही. राहुरी- शनी शिंगणापूर या रस्त्याच्या सिमेंट क्रॉंकिटीकरण करण्याच्या प्रस्तावामध्ये राहुरीसाठी उड्डाणपूल समाविष्ट करु असे तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले होते. मात्र ते देखील झाले नाही.