नवी दिल्ली – भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीचा आयपीओ अनेक वेळा लांबणीवर पडला आहे. मार्च महिन्यामध्ये या कंपनीचा आयपीओ येणार होता. मात्र युद्ध सुरू झाल्यामुळे त्यावेळी येऊ शकला नाही. आता हा आयपीओ पुन्हा कधी जारी होणार या संदर्भात या आठवड्यात केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आयपीओच्या माध्यमातून एलआयसीचे पाच टक्के भाग भांडवल 31.6 कोटी शेअरद्वारा विकले जाणार आहे. आयपीओसाठी अगोदरच शेअर बाजार नियंत्रकाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. या आधारावर 12 मेपर्यंत हा आयपीओ जुन्या कागदपत्रांच्या आधारावर जारी केला जाऊ शकतो. या आयपीओला देशातील किरकोळ गुंतवणूकदाराकडून आणि देशातील संस्थागत गुंतवणूकदारांकडून बराच प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
मात्र युद्ध सुरू झाल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा प्रतिसाद मिळेल की नाही याबाबत केंद्र सरकारला शंका आहेत. कारण युद्धामुळे आणि अमेरिका व्याजदर वाढ करीत असल्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून अगोदरच बरीच विक्री केली आहे. केंद्र सरकारला वित्तीय तूट भरून काढण्यासाठी हा आयपीओ काढणे गरजेचे आहे. या आयपीओमधून किमान 60 हजार कोटी रुपये मिळण्याची सरकारला अपेक्षा आहे.
त्यामुळे या आठवड्यात केंद्र सरकार आयपीओची तारिख ठरविण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या आपीओमुळे शेअर बाजारात सध्या आलेली मरगळ दूर होण्यास मदत होईल असेही सरकारला वाटते.
अन्यथा सप्टेंबर उजाडू शकतो
12 मार्चपर्यंत हा आयपीओ निघाला नाही तर पुन्हा कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये हा आयपीओ ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये येऊ शकतो असे विश्लेषकांना वाटते. कारण नव्या कागदपत्रात नव्या तिमाहीतील ताळेबंद सादर करावा लागणार आहे.